दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 05:56 IST2026-05-09T05:51:27+5:302026-05-09T05:56:29+5:30
नेहमीप्रमाणे कोकण विभागाची अव्वल कामगिरी, छत्रपती संभाजीनगर विभाग शेवटून पहिला, १५.५५ लाखांमधून १४ लाख २० हजार ४७६ विद्यार्थ्यांचे यश

दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
Marathi News : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल यंदा ९२.०९ टक्के लागला. गतवर्षी ही टक्केवारी ९४.१० हाेती. विशेष म्हणजे यंदा बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीचा निकालही सरासरी २ टक्क्यांनी घसरला आहे. राज्य मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला. यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९७.६२ टक्के; तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.४१ टक्के लागला आहे.
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
यंदा राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले. यात सर्वाधिक १०४ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. गतवर्षी हा आकडा २११ इतका हाेता. नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ टक्के असून, मुलांची टक्केवारी ८९.५६ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा टक्का ५.४० ने जास्त आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात एकूण १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यापैकी १४ लाख २० हजार ४७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेसाठी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
सोलापूरच्या निकिताला सर्व विषयांत ३५ गुण
सोलापूर : दहावी परीक्षेेत ज. रा. चंडक प्रशाला, बाळे येथील विद्यार्थिनी निकिता अमोल कुचेकर हिने सर्वच विषयांत प्रत्येकी ३५ गुण मिळवत एक वेगळीच नोंद केली आहे. तिच्या या अनोख्या निकालाची परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चा होत असून मित्र परिवार व शिक्षकांकडून तिचे कौतुक होत आहे. अशा निकालांना ‘परफेक्ट ३५’ किंवा ‘काठावर पास’ म्हणून संबोधले जाते.
कष्टाचे हॉटेल आणि जिद्दीची ‘पासिंग’
शिराढोण (जि. धाराशिव) : दहावीच्या निकालात कुणी ९० टक्के, कुणी ८५ टक्के मिळवत चर्चेत आलं; पण कळंब तालुक्यातील शिराढोण गावात सध्या चर्चा आहे ती मोहित नाईकवाडे या विद्यार्थ्याची. सर्वच विषयात ३५ गुण मिळवत एकूण ३५ टक्क्यांनी पास होण्याची भन्नाट कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या वयात हॉटेल व्यवसाय चालवत त्याने ही कामगिरी केली आहे.