निवडणूक जिंकताच BNP रंग दाखवला, भारत-बांगलादेश तणाव वाढण्याची शक्यता; तारिक रहमान यांचा पक्ष मोठी मागणी करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 23:39 IST2026-02-13T23:38:38+5:302026-02-13T23:39:13+5:30
या विजयानंतर बीएनपीने घेतलेल्या एका भूमिकेमुळे भारत आणि बांगलादेश मधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. कारण...

निवडणूक जिंकताच BNP रंग दाखवला, भारत-बांगलादेश तणाव वाढण्याची शक्यता; तारिक रहमान यांचा पक्ष मोठी मागणी करण्याच्या तयारीत
बांगलादेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकीत तारिक रहमान यांच्या 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'ने (BNP) मोठा आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत एकूण २९९ जागांपैकी २१२ जागांवर विजय मिळवत बीएनपीने स्पष्ट बहुमत प्राप्त केले. तर जमात-ए-इस्लामीला ७७ जागा मिळाल्या. या विजयानंतर बीएनपीने घेतलेल्या एका भूमिकेमुळे भारत आणि बांगलादेश मधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. कारण बीएनपीने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशला सोपवण्यासदर्भात पुनरुच्चार केला आहे.
बीएनपीच्या प्रचंड विजयानंतर लगेचच, पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य सलाहुद्दीन अहमद म्हणाले, "आपला पक्ष भारताकडे शेख हसीना यांना खटल्यासाठी बांगलादेशला प्रत्यार्पण करण्याची औपचारिक विनंती करेल." ते पुढे म्हणाले, आपला पक्ष सातत्याने मागणी करत आला आहे की, हसीना यांना बांगलादेशात आणावे आणि कायद्यानुसार खटला चालवण्यात यावा. तसेच, दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार हा मुद्दा सोडवावा. भारतही सहकार्य करेल, अशी अपेक्षा आहे, असेही अहमद यांनी म्हटले आहे.
असी आहे भारताची भूमिका -
दरम्यान, शेख हसीना यांनी १२ फेब्रुवारी रोजी, या निवडणुका 'दिखावा' असल्याचे म्हटले होते. हसीना यांच्या प्रत्यार्पणासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे की, शेख हसिना यांच्या प्रत्यर्पनासंंदर्भातील विनंती प्राप्त झाली आहे. यावर कायदेशीर आणि न्यायिक प्रक्रियेनुसार विचार केला जात आहे. यामुळे आता बांगलादेशच्या भविष्यातील भूमिकांचा आगामी काळात दोन्ही देशांच्या संबंधांवर कसा परिणाम होतो, हे बघणे महत्त्वाचे ठरेल.