'ऑपरेशन हेरॉफ'ने पाकिस्तान हादरलं; ७० अतिरेकी ठार, १० जवान मृत्यूमुखी; १२ शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 08:57 IST2026-02-01T08:46:11+5:302026-02-01T08:57:23+5:30
बलुचिस्तानमध्ये रक्ताचा सडा पडला असून ७० अतिरेकी ठार, १० सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला आहे.

'ऑपरेशन हेरॉफ'ने पाकिस्तान हादरलं; ७० अतिरेकी ठार, १० जवान मृत्यूमुखी; १२ शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले
Baloch Militants Strike: पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत शुक्रवारी रात्रीपासून भीषण हिंसाचाराने हादरला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या प्रतिबंधित संघटनेने पुकारलेल्या ऑपरेशन हेरॉफच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत १२ शहरांमध्ये एकाच वेळी हल्ले केले. या संघर्षात आतापर्यंत ७० अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, देशाचे रक्षण करताना १० सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा सुरू झालेले हे हल्ले शनिवारी सकाळपर्यंत सुरू होते. क्वेटा, ग्वादर, मकरान, हब, चमन, नसीराबाद आणि नुश्की यांसारख्या प्रमुख शहरांमधील पोलीस ठाणी, फ्रंटियर कोअरच्या चौक्या आणि सरकारी मालमत्तांना लक्ष करण्यात आले. अतिरेक्यांनी रेल्वे रुळांवर स्फोटके पेरून वाहतूक विस्कळीत करण्याचाही प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी वेळीच हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला.
ग्वादरमध्ये अतिरेक्यांनी एकाच कुटुंबातील सदस्यांसह निरपराध नागरिकांची निर्घृण हत्या केली. बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी ७० अतिरेकी मारले गेल्याची पुष्टी केली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बीएलएने दावा केला आहे की त्यांनी नुश्की येथील दहशतवादविरोधी विभागाचे मुख्यालय आणि फ्रंटियर कोअरच्या तळाचा ताबा घेतला आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे.
दहशतवादाचा वाढता आलेख
पाकिस्तानात २०२५ या वर्षात दहशतवादी घटनांमध्ये ३४ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण ६९९ घटनांची नोंद झाली आहे. बलुचिस्तानमध्येही हिंसाचाराचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी वाढले आहे. सध्या या भागात लष्कराकडून क्लिअरन्स ऑपरेशन सुरू असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.