हिंगोली : प्रादेशिक हवामान केंद्र येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ७ ते १० मार्चदरम्यान असे चार दिवस आकाश स्वच्छ राहून, अंशत: ढगाळ राहील. तसेच चार दिवसांत तापमानात किंचित वाढ होईल, असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे करून पीक तणविरहित ठेवावे. काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी आणि गव्हाची काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या बागेमध्ये खोडाजवळ आच्छादन करून घ्यावे. केळीच्या बागेत झाडांना काठीचा आधार द्यावा. केळीच्या बागेत ५० ग्रॅम प्रतिझाड मुरियट ऑफ पोटॅश या खताची मात्रा देऊन पाणी वेळच्या वेळी द्यावे. तसेच आंबा बागेमध्ये पाणी व्यवस्थापन वेळेवर करून फळगळ दिसून येत असल्यास ५० पीपीएम जीर्बलिक ॲसिडची फवारणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी, असा सल्ला कृषीतज्ज्ञांनी दिला आहे.