महिलेचा मृत्यू नैसर्गिक की खून? संशयामुळे मृतदेह उकरून बाहेर काढला, शवविच्छेदनासाठी पाठवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 20:55 IST2025-06-29T20:54:50+5:302025-06-29T20:55:47+5:30
शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत मृत्यूचा प्रकार स्पष्ट होणार नाही. तोपर्यंत सर्व शक्य त्या बाजूंनी तपास केला जात आहे. मृत्यू नैसर्गिक आहे की खून हे अहवालानंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

महिलेचा मृत्यू नैसर्गिक की खून? संशयामुळे मृतदेह उकरून बाहेर काढला, शवविच्छेदनासाठी पाठवला
गोंदिया : अनेक दिवस आजारी असलेल्या महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून खून झाला असावा, या संशयावरून पोलिसांनी मृतदेह उकरून काढल्याची घटना तालुक्यातील ग्राम दासगाव बुज येथे रविवारी (दि. २९) घडली. भारती सुरेंद्र शहारे (४५, रा. दासगाव बुज), असे मृत महिलेचे नाव आहे.
भारती गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. शुक्रवारी (दि. २७) त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी हा आजारपणामुळेच मृत्यू झाला असावा, असे समजून गावातील स्मशानभूमीत दफन विधी करून अंत्यसंस्कार केले होते. मात्र, या मृत्यूमागे काहीतरी काळेबेरं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या १७ वर्षीय मुलाने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी गंभीरतेने दखल घेत शनिवारी (दि. २८) मुलाचा शोध घेतला. तसेच रविवारी (दि. २९) पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तालुका दंडाधिकारी समशेर पठाण यांच्या उपस्थितीत मृतदेह उकरून बाहेर काढला. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.
शवविच्छेदन अहवाल येईपर्यंत मृत्यूचा प्रकार स्पष्ट होणार नाही. तोपर्यंत सर्व शक्य त्या बाजूंनी तपास केला जात आहे. मृत्यू नैसर्गिक आहे की खून हे अहवालानंतरच कळेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अंडी विकून भरायची पोट
- पतीच्या निधनानंतर मुलगा व आई घरी राहायची. परंतु काही दिवसांपासून मुलगाही नागपूरला राहायचा. अधून-मधून तो गावाला येत असे. भारती शहारे गावातच फिंगर आणि अंडी विकून आपले पोट भरायची. मुलगा गावाला आला आणि आईचा मृत्यू झाला. पहिल्या दिवशी तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे नातेवाईक व गावकऱ्यांना वाटले. परंतु पोलिसांना मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून तिचा खून झाल्याचा दाट संशय बळावला अन् तो मृतदेह उकरून काढला.
- अहवालानंतर ठरेल तपासाची दिशा
- भारती शहारे यांचा गावातील स्मशान भूमीत दफनविधी करण्यात आला होता. परंतु पोलिसांनी तो मृतदेह रविवारी उकरून तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेला. उत्तरीय तपासणीत तिच्या मृत्यूचे कारण कोणते, हे कळेल.