अर्जुनी गावातून जड वाहतूक बंद करा

By Admin | Updated: August 12, 2014 00:01 IST2014-08-12T00:01:22+5:302014-08-12T00:01:22+5:30

तिरोडा तालुक्यातील अर्जुुनी येथील वैनगंगा नदीच्या रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले. या नदी घाटावरून रेती काढण्यासाठी व रेतीची वाहतूक करण्यासाठी अर्जुनी गावातून रात्रंदिवस मोठ्या

Turn off heavy traffic from Arjuni village | अर्जुनी गावातून जड वाहतूक बंद करा

अर्जुनी गावातून जड वाहतूक बंद करा

इंदोरा बु. : तिरोडा तालुक्यातील अर्जुुनी येथील वैनगंगा नदीच्या रेतीघाटाचे लिलाव करण्यात आले. या नदी घाटावरून रेती काढण्यासाठी व रेतीची वाहतूक करण्यासाठी अर्जुनी गावातून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक होत आहे. त्यामुळे गावातील रस्ता पूर्णत: उखडला आहे. गावातून जड वाहतूक बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
याच रस्त्यावर हायस्कूल व प्राथमिक शाळा असून विद्यार्थ्यांची धावपळ नेहमीच सुरु असते. गावातील रस्ता अरूंद आहे व या रस्त्यावर एकामागे एक पाच ते सात मोठ्या टिप्परची ये-जा सुरू असते. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांनासुध्दा फार त्रास सहन करावा लागत आहे. जड वाहनांमुळे पूर्ण रस्ता उखडला असून रस्त्याच्या बाजूला व रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे. सदर रस्ता एकेरी वाहनांच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. परंतु या रस्त्यावरून रेतीच्या जड वाहनांमुळे पूर्ण रस्ता तुटका व खड्डेमय झाला आहे. यात विद्यार्थी व नागरिकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर केव्हाही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच रस्त्यावरून अर्जुनी-सावरा-पिपरिया बससुध्दा चालत आहे. यात रेतीचे ट्रक आल्यास या रस्त्यावरून बस धावणे कठीण होत असून केव्हाही अपघात होऊ शकतो. ग्रामपंचायतला माहिती असूनसुध्दा ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांनी डोळे बंद करून आंधळ्याचे सोंग घेतले आहे. पिपरिया वैनगंगा नदीच्या रेतीघाटाचे लिलाव रद्द करून जड वाहनांची वाहतूक थांबवावी, अशी आग्रही मागणी येथील ग्रा.पं. सदस्य किरण सुरजलाल साठवणे यांच्यासह नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन चौकशी करावी व नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)

Web Title: Turn off heavy traffic from Arjuni village