जिल्ह्यात पावसाचे होतेय कम बॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:33+5:30
यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जून महिन्यात पाठ फिरविलेल्या पावसाने जुलै महिन्यात सुरूवातीपासूनच दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात पावसाचे कमबॅक झाल्याने बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे.मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने रोवणीच्या कामाला सुध्दा काही प्रमाणात वेग आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास खरिपातील पिकांना सुध्दा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
यंदा मृग आणि त्यानंतरच्या पावसाच्या दोन नक्षत्रांनी शेतकऱ्यांची निराशा केली. त्यामुळे पेरणी आणि रोवणीची कामे लांबणीवर पडली होती. तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षीचा पावसाचा अंदाज घेत धूळ पेरणी केली होती. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते.
या पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते. पण यंदा सुरूवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगाम कसा होणार अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित होती. तर ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ २३ टक्के रोवणी आटोपली होती. त्यामुळे उर्वरित रोवणी कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला होता.
मात्र गेल्या चार पाच दिवसांपासून पाऊस अधून मधून हजेरी लावत असल्याने रोवणीच्या कामासाठी याची मदत होत आहे. गुरूवारी (दि.९) सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडे आनंदाचे वातवरण होते. सालेकसा तालुक्यात सुध्दा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे या भागात काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाने सुध्दा पुढील दोन दिवस दमदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाचे कमबॅक होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.