‘रिक्षाचालक’ जितेंद्र झाला चव्हाण साहेब !

By Admin | Updated: January 3, 2015 23:04 IST2015-01-03T23:04:19+5:302015-01-03T23:04:19+5:30

बाबांनी म्हटलं शाळा शिक, बाबा लय शिकले... समाज घडवया, तूबी शिक... आपलं जीवन घडवया... कुणाचे तरी हे शब्द एका निरागस लहान मुलाच्या जीवनात क्रांतिकारी ठरले. पहिल्या वर्गात त्या मुलाला

Rickshaw driver Jitendra became Chavan Saheb! | ‘रिक्षाचालक’ जितेंद्र झाला चव्हाण साहेब !

‘रिक्षाचालक’ जितेंद्र झाला चव्हाण साहेब !

संघर्षमय प्रवासात खचले नाही : फुले-शाहू-आंबेडकरी विचारांनी दाखविली वाट
देवानंद शहारे - गोंदिया
बाबांनी म्हटलं शाळा शिक, बाबा लय शिकले... समाज घडवया, तूबी शिक... आपलं जीवन घडवया... कुणाचे तरी हे शब्द एका निरागस लहान मुलाच्या जीवनात क्रांतिकारी ठरले. पहिल्या वर्गात त्या मुलाला आई-वडिलांनी केवळ पाटी व कलम घेवून दिली. नंतर त्या गरीब मुलाने स्वबळावर परिश्रम घेत शिक्षण घेतले.
आज त्या मुलाने यशाची झेप घेत रिक्षाचालक, शेतमजूर, हमाल, सर्व शिक्षा अभियान विभागात विषयतज्ज्ञ ते शासकीय कृषी विभागात लिपीक पदापर्यंत मजल गाठली. तिरोडा तालुक्यातील उमरी गावाचे रहिवाशी जितेंद्र रामचंद्र चव्हाण असे त्यांचे नाव.आपली जीवन संघर्ष गाथा सांगताना वयाची ४६ वर्षे ओलांडलेल्या जितेंद्र चव्हाण यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, मात्र चेहऱ्यावर मंद स्मित होते. फुले-शाहू-आंबेडकरांची विचारधारा जीवनात आल्यानेच शिकण्याची व संघर्ष करण्याची जणू शक्तीच मिळत गेल्याचे व जीवन चरितार्थ झाल्याचे ते म्हणाले.
जितेंद्र पहिल्या वर्गात वडिलांनी दाखल केल्यावर जितेंद्र तीन रूपये रोजीने शेतमजूर म्हणून काम करीत असे. त्याने उमरी जवळील धादरी गावच्या जि.प. शाळेत आपले सातवीपर्यंतचे पूर्ण करीत शेतमजुरीच्या पैशातून वह्या-पुस्तकांची गरज भागवायचा. यानंतर विहीर खोदमाकामावर मजूर म्हणून काम करीत त्याने तिरोडा येथील शहीद मिश्रा विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आई-वडील गरीब असल्याने शिक्षणासाठी पैसे मिळू शकत नव्हते. म्हणून त्याने मजुरीचे पैसे शिक्षणासाठी वापरण्याचा संकल्प केला होता. कारण ‘बाबांनी म्हटलं शाळा शिक...’ हे शब्द त्याच्या कानात नेहमीच गुंजायचे.यानंतर भीषण दारिद्र्यामुळे चव्हाण कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी गाव सोडावे लागले. ते नागपूरजवळ कामठी येथे रहायला गेले. तेथे ते सर्व मजुरी करीत. मात्र जितेंद्रला शिक्षणाची ओढ होती. त्याने तिरोड्याच्या सी.जे. पटेल महाविद्यालयात ११ वीमध्ये प्रवेश घेतला व कामठीला जावून घर बांधकामावर मजुरी करू लागला. मिळालेल्या पैशातून काही कुटुंबाला देणे, उर्वरित पैशातून पुस्तके खरेदी करणे व कधीकधी तिरोड्यात येवून विद्यालयात जाणे, असा त्याचा नित्यक्रम होता. अशाचप्रकारे त्याने त्याच महाविद्यायात पदवीपर्यंचे शिक्षण पूर्ण केले.
यावेळी तो नागपूरला रिक्षा चालवून आपले शिक्षण व कुटूंब दोन्ही सांभाळू लागला. दरम्यान फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे साप्ताहिक ‘बहुजण नायक’ त्याच्या हाती पडले व त्यांच्या जीवनात बदल घडून शिक्षणाची जिद्द वाढतच गेली. त्यांनी धादरीच्या तलाठी कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून १९९८ पर्यंत कार्य केले. परंतु ‘बाबांनी म्हटल शाळा शिक...’ हे शब्द आठवत राहिल्याने त्यांनी २००५ पर्यंत नागपूर-कामठी येथे रिक्षा चालवून, घरबांधकावर मजुरी करून स्पर्धा परीक्षांची अनेक पुस्तके खरेदी केल्या. या पुस्तकांचा अभ्यास करीत ते शासनाच्या सर्व शिक्षा अभियान विभागाची परीक्षा उत्तीर्ण झाले व देवरी येथे सन २००६ विषयतज्ज्ञ म्हणून रूजू झाले.
यानंतरही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच ठेवला व अमरावती कृषी विभागाची लिपीक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. ते २०११ च्या डिसेंबरमध्ये तिथे रूजू झाले.

Web Title: Rickshaw driver Jitendra became Chavan Saheb!