मेडिकल कॉलेजच्या समस्येकडे राजेंद्र जैन वेधणार लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 06:00 AM2020-01-24T06:00:00+5:302020-01-24T06:00:21+5:30
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. यासाठी कुडवा परिसरात जागा देखील निश्चित केली असून इमारत बांधकामासाठी ४३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियोजित जागेवर इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. इमारत बांधकामासाठी ४३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून त्याचे बजेट सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केले आहे. मात्र यानंतरही बांधकामाला सुरूवात केली नाही. परिणामी जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही समस्या त्वरीत मार्गी लावण्यात यावी, यासाठी माजी आ.राजेंद्र जैन हे शुक्रवारी पालकमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन त्यांचे या समस्यांकडे लक्ष वेधणार आहेत.
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी शासनाने वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली. यासाठी कुडवा परिसरात जागा देखील निश्चित केली असून इमारत बांधकामासाठी ४३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
मात्र सर्व गोष्टी सुरळीत असताना देखील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू करण्यात आले नाही. यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या इमारतीच्या बांधकामाला केव्हा सुरूवात होणार आणि ते केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न कायम आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करुन या महाविद्यालयाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, जिल्हा क्रीडा संकुलाला राजाभोज यांचे नाव देण्यात यावे. यासह गोंदिया ईर्स्टन बायपास कारंजा, मुर्री, ढाकणी या परिसरातून जाणार असून हा मार्ग थेट तिरोडा मार्गावर निघणार आहे. मात्र अद्यापही याचे भूसंपादनाचे काम प्रलंबित असल्याने शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. तर मागील तीन चार वर्षांपासून शहरातील अनेक विकास कामे रखडली आहेत.ती मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.तसेच शहरातील रस्त्यांची स्थिती अंत्यंत बिकट असून या सर्व समस्यांकडे पालकमंत्री अनिल देशमुख यांचे लक्ष वेधून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जैन यांनी सांगितले.