दीड एकर शेतीत घेतले चार लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:33+5:30
वाघनदीच्या किनाऱ्यावर वसलेले नवेगाव हे गाव चवदार वांगी व इतर भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील निम्मे लोक नदी लगत जमिनीवर भाजीपाला उत्पादन घेवून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु नोहरलाल दमाहे नदीच्या किनाऱ्यावर भाजीपाला पिकाची लागवड करण्याऐवजी धानपिक घेण्याच्या शेतीत वांगी उत्पादन घेवून सर्वांना आश्चर्य चकीत केलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : काही करण्याची जिद्द व चिकाटी असेल तर वयाची किंवा परिस्थिती बाधा आडवी येत नाही. हे सिद्ध करुन दाखविले आहे नवेगाव येथील ७० वर्षीय शेतकरी नोहरलाल पंचम दमाहे यांनी. त्यांनी दीड एकर शेतीत चार लाख रुपयांचे वांगी पिकाचे उत्पादन घेतले आहे.
वाघनदीच्या किनाऱ्यावर वसलेले नवेगाव हे गाव चवदार वांगी व इतर भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील निम्मे लोक नदी लगत जमिनीवर भाजीपाला उत्पादन घेवून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु नोहरलाल दमाहे नदीच्या किनाऱ्यावर भाजीपाला पिकाची लागवड करण्याऐवजी धानपिक घेण्याच्या शेतीत वांगी उत्पादन घेवून सर्वांना आश्चर्य चकीत केलेले आहे. धानपिक घेण्यासंबंधी गुणाकार भागाकार केला तर दीड एकर शेतीत धान उत्पादनातून जेमतेम ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. त्यातच ३० हजार रुपायपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त लागवड खर्च येतो. त्यावर शेतकरी कुटुंबाने केलेल्या मेहनतीचा विचार केला तर हातात काहीच उरत नाही.
या दृष्ट चक्रातून बाहेर निघण्याचा विचार करुन नोहरलाल दमाहे यांनी दीड एकर जमिनीत वांगी उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. प्रतिकुल वातावरण बघता अनेक वेळा असे वाटायचे की वांगी उत्पादनासाठी केलेली पैशाची गुंतवणूक जोखीमेची तर ठरणार नाही. परंतु दमाहे परिवाराची जीवापाड मेहनत वांगण्याच्या प्रत्येक झाडाची निगा राखणे, वेळेवर पाणी देणे, खत देणे, किटकनाशकाचा वापर करणे, यात कुठेही कमी पडू न देण्याचा निर्धार यामुळे प्रतिकुल वातावरणात सुद्धा वांगी उत्पादन वाढविले. ढगाळ वातावरणाचा फटका बसत मोठ्या प्रमाणावर वांग्यांना किडीचा प्रादुर्भाव सुद्धा झाला. परंतु यामुळे दमाहे कुटुंबीय क्वचित ही खचले नाही. आपल्या कुटुंबातील चार पाच लोक व इतर चार पाच लोक मिळून जवळपास दहा लोक सतत परिश्रम घेत असतात. यात काही झाडांची निगा करण्यात काही लोक वांगी तोडण्यात तर काही लोक विक्री करण्यात व्यस्त असतात.
लॉकडाऊनचा फटका
कोरोनामुळे आठवडी बाजार बंद पडले आहेत. त्यामुळे वांग्याची मागणी मोठ्या प्रमाणात नाही. लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम रद्द झाले असल्याने फार मोठ्या प्रमाणात वांग्यांची मागणी नाही. कोरोना काळात गावा-गावात फेरीवाले भाजीपाला विक्री करीत आहे. असे फेरीवाले आपल्या क्षमतेनुसार वाडीवर येवून वांगी खरेदी करतात. तरी सुद्धा वांगी उत्पादन करणे, धानाच्या उत्पादनापेक्षा जास्त फायदेशीर आहे. हे दमाहे परिवाराने सिद्ध करुन दाखविले आहे.