गोंदियातील शेतकरी धान विक्रीपासून वंचित; चुकाऱ्यांसाठी २४८ कोटी रुपयांच्या निधीची गरज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 19:52 IST2026-02-27T19:51:18+5:302026-02-27T19:52:33+5:30
Gondia : शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरीप हंगामात दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट संपले. मात्र उद्दिष्ट वाढवून न दिल्याने धान खरेदी ठप्प आहे. तर गेल्या महिनाभरापासून चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त न झाल्याने २४८ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत.

Farmers in Gondia deprived of paddy sales; Rs 248 crore needed for defaulters
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला खरीप हंगामात दिलेले धान खरेदीचे उद्दिष्ट संपले. मात्र उद्दिष्ट वाढवून न दिल्याने धान खरेदी ठप्प आहे. तर गेल्या महिनाभरापासून चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त न झाल्याने २४८ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. तर शासनाने अद्यापही धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उद्दिष्ट, चुकारे अन बोनसची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून हमीभावाने धान खरेदी केली जाते. यंदा खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला २५ लाख ९२ हजार क्विंटलचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट तीन दिवसांपूर्वीच संपल्याने धान खरेदी ठप्प झाली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी बीम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे.
यासाठी जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ६१४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी आतापर्यंत ८१ हजार ३८७ शेतकऱ्यांनी २५ लाख ६० हजार क्विंटल धानाची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केली. फेडरेशनने खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ६०५ कोटी ६९ लाख रुपये आहे.
यापैकी आतापर्यंत ३५७ कोटी १४ लाख रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर २४८ कोटी रुपयांचे चुकारे गेल्या महिनाभरापासून थकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
३६ हजार ८१४ शेतकरी अडचणीत
शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ६१४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८१ हजार ३८७ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली. तर ३६८१६ शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. धान खरेदीचे उद्दिष्ट संपल्याने हे शेतकरी अडचणीत आले आहे. शासनाने खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न दिल्यास या शेतकऱ्यांवर खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धानाची विक्री करण्याची वेळ येऊ शकते.
१ लाख ३२ हजार शेतकरी बोनससाठी पात्र
शासनाकडून दरवर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहान अनुदान म्हणून बोनस जाहीर केला जातो. मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना हेक्टरी बोनस जाहीर केला जात आहे. साधारणपणे दरवेळेस हिवाळी अधिवेशनात बोनसची घोषणा केली जाते; पण यंदा अद्यापही धान उत्पादकांना बोनस जाहीर करण्यात आला नाही. बोनससाठी नोंदणीनुसार जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार ६१४ शेतकरी पात्र ठरले आहे.