गोंदिया : किडनीचा आजार म्हटला की अंगारवर काटे आल्याशिवाय राहात नाहीत. शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे काम किडण्यांद्वारे होते. मात्र किडनीचे कार्य पूर्णपणे बंद झाले तर ‘डायलेसिस’ ही प्रक्रिया करून कृत्रिमपणे रक्त शुद्धीकरणाचे काम करावे लागते. गोंदियातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या डायलेसिस सुविधेमुळे अनेकांना नवजीवन मिळत आहे. गेल्या १३ महिन्यात सरासरी ८५ रूग्ण याप्रमाणे आतापर्यंत ११०९ रुग्णांवर डायलेसिसचा उपचार करण्यात आला आहे.नोव्हेंबर २०१३ मध्ये केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात किडनी आजाराच्या रूग्णांसाठी एक विशेष केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यात सध्या फिजीशियन म्हणून डॉ. प्रगती भोडे सेवा देत आहेत. तर नेफ्रोलॉजिस्ट म्हणून डॉ. वंदना बारस्कर या आठवड्यातून एक दिवस सेवा देतात. एवढ्या मोठ्या संख्येतील रूग्णांना नियमित सेवा देणे एकाच डॉक्टरला शक्य नसते. त्यामुळे या केंद्रात नियमित सेवेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे. डायलेसिस म्हणजे कृत्रिम किडणीद्वारे (मशिन) शरीरातील किडणीमधील घाण स्वच्छ केली जाते. कधीकधी एकाच रूग्णाला अनेकदा डायलेसिस करावे लागते. त्यांना एकाच दिवसात सुट्टी दिली जाते. तर नवीन किंवा गंभीर रूग्ण असल्या त्याला तीन ते चार दिवसपर्यंत रूग्णालयात दाखल रहावे लागते. क्वचितप्रसंगी अशा रूग्णांना अतिदक्षता गृहात (आयसीयू) दाखल करावे लागते. सध्या जिल्हा सामान्य रूग्णालायात डायलेसिस प्रक्रियेसाठी लागणाऱ्या मशिन्स, इंजेक्शन, रक्तवाढीच्या औषधी उपलब्ध आहेत. मात्र २४ तास नियमित सेवा देणाऱ्या त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. (प्रतिनिधी)
महिन्याकाठी होतेय ८५ रूग्णांवर डायलेसिस
By admin | Published: December 18, 2014 1:22 AM