मतदारसंघाच्या मागणीवरुन नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 05:00 AM2019-10-01T05:00:00+5:302019-10-01T05:00:45+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी अद्यापही एकाही मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ठ आणि स्वत:ला पुढारी समजून घेणाऱ्यांनी मतदारसंघाच्या वाटपावरुन नाराजीचे नाट्य सुरू केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी अद्यापही मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असली तरी अद्यापही एकाही मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले नाही. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतुष्ठ आणि स्वत:ला पुढारी समजून घेणाऱ्यांनी मतदारसंघाच्या वाटपावरुन नाराजीचे नाट्य सुरू केले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांनी अद्यापही मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही. मात्र स्वत:ला पुढारी समजून घेणारे काही स्वंघोषीत पुढारी कार्यकर्त्यांना पुढे करुन विरोध करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
गोंदिया जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघापैकी गोंदिया, आमगाव आणि अर्जुनी मोरगाव हे मतदारसंघ आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला होते. तर तिरोडा मतदारसंघ राष्ट्रावादीच्या वाट्याला होता. मात्र २०१४ निवडणूक या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढविली होती. त्यामुळे अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा, आमगाव विधानसभा मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यावेळी राष्टÑवादी काँग्रेसकडून अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या मतदारसंघासाठी आग्रह धरला जात आहे. त्यात काही गैर नाही. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावरुन कुठलेच मतभेद नाहीत. कारण अद्याप या चारही मतदारसंघात जागा वाटपाचे सूत्र आणि उमेदवारीबाबत निर्णय झालेला नाही.
त्यामुळे या विरोध किवा समर्थन करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र स्वत:ला पुढारी समजणाऱ्यांनी यावरुन विरोध करण्यास सुरूवात केली आहे. यासाठी कार्यकर्त्यांचे नावे पुढे करुन स्वत: मात्र मागे राहण्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे यावर मतदारच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच हे नाट्य कशाला असा सूर देखील आवळला जात आहे. दरम्यान यासर्व प्रकाराची या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय दखल घेतात हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पाच वर्षांत कुठली कामगीरी
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सर्वच पक्षांतून इच्छूकांची भाऊ गर्दी वाढली आहे. जो तो उमेदवारीसाठी दावा करीत आहे. ज्या इच्छुकांची नावे पक्षातील कार्यकर्त्यांनी कधीच ऐकली नाही त्यांची सुध्दा नावे पुढे येत आहे. मागील पाच वर्षांत कधीही मतदारांच्या संर्पकात नसलेले आणि पक्षासाठी कुठलीही कामगीरी न करणारे सुध्दा उमेदवारीसाठी दावेदारी करीत असल्याचे चित्र आहे.