सुट्टी दिवशी कालव्यात आंघोळीला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले; घटनेने हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 08:34 IST2026-04-20T08:34:42+5:302026-04-20T08:34:42+5:30
बाब्रोमोड्डी-केपे येथील घटना

सुट्टी दिवशी कालव्यात आंघोळीला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे बुडाले; घटनेने हळहळ
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मौजमस्ती करण्यासाठी मडगावहून केपे येथे गेलेल्या दोन युवकांचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. इग्नेशियस शिरील फर्नाडिस (२२, फातोर्डा) आणि हर्षित सिंग (२०, उत्तराखंड) अशी मृतांची नावे असून, दोघेही माजोर्डा येथील आयटीसी हॉटेलमध्ये कार्यरत होते.
रविवारी सकाळी ९ च्या सुमारास हे दोघे मडगावहून केपे तालुक्यातील साळवली-बोब्रीमोड्डी परिसरातील जलसंपदा विभागाच्या मुख्य कालव्याजवळ पोहोचले. वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी त्यांनी कालव्यात उतरून पोहण्याचा निर्णय घेतला.
घटनाक्रम एका नजरेत
इग्नेशियस आणि हर्षित रविवार सकाळी मडगावहून केपे येथे गेले, त्यानंतर साळवली-बोब्रीमोड्डी परिसरातील मुख्य कालव्याजवळ पोहोचले, उकाड्यामुळे दोघेही पाण्यात उतरले. मात्र काही मिनिटांतच खोल पाण्यात बुडाले. कालव्याच्या ठिकाणी पोहण्यास मनाई असूनही अनेकजण इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे; खोल पाणी आणि तीव्र प्रवाहामुळे अशा ठिकाणी अपघातांची शक्यता अधिक असून, वारंवार गस्त घालूनही धोका टळत नसल्याची खंत अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
प्राथमिक माहितीनुसार, कालव्याच्या पाण्याची खोली आणि प्रवाहाची तीव्रता याचा योग्य अंदाज न आल्याने दोघेही काही वेळातच पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. परिसरात कोणी मदतीला धावून येण्याआधीच ते पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच केपे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कुडचडे अग्निशामक दलाच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. काही वेळाने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. सध्या मृतदेह मडगाव जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास केपे पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रशांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलिस अधीक्षक संतोष देसाई देखील या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत. या घटनेमुळे मडगाव परिसरात शोककळा पसरली असून, दोन्ही कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे.