वाघामुळे म्हादई, जुवारी नद्या सुरक्षित: राजेंद्र केरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:14 IST2026-04-29T13:13:15+5:302026-04-29T13:14:27+5:30
पणजी येथील कार्यक्रमात स्व. नारायण आठवले स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान

वाघामुळे म्हादई, जुवारी नद्या सुरक्षित: राजेंद्र केरकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादई आणि नेत्रावळी या दोन अभयारण्यांबाबत बोलण्याची संधी जेव्हा मिळाली, तेव्हा मी आमच्या राज्यात वाघ असल्याचे पुरावे सादर केले होते. त्यानंतर तत्कालिन प्रशासनाने अधिसूचना जारी करत म्हादई आणि नेत्रावळी ही दोन अभयारण्य म्हणून घोषित केली. यातूनच आज म्हादई आणि जुवारी नद्यांचे रक्षण झाले, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. राजेंद्र केरकर यांनी केले.
ढवळी-फोंडा येथील लोकविश्वास प्रतिष्ठानतर्फे स्व. नारायण आठवले स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रा. केरकर यांना काल मंगळवारी प्रदान करण्यात आला. कला अकादमीत हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रा. केरकर बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वाल्मिकी मिनेझिस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत लोकविश्वास प्रतिष्ठानचे अनुप प्रियोळकर, प्रदीप सरमोकदम, राज वैद्य यांची उपस्थिती होती.
केरकर यांनी सांगितले की, राज्यात दोन अभयारण्य का हवी, या विषयावरून चर्चा होती. त्यावेळीचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल जॅकोब यांनी, शास्त्रज्ञांचे काहीच न ऐकता स्थानिकांच्या मतांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. तेव्हा मी पुढाकार घेत गोवा ही वाघाची भूमी असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी या दाव्याला नाकारले आणि गोव्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातून वाघ येतात, असे सांगितले. मी एका आठवड्यात त्यांना गोव्यातील वाघांच्या अस्तित्वाबाबतचे पुरावे आणून दिले तेव्हा त्यांनी ते मान्य करत या दोन अभयारण्याला मान्यता दिली. यातून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. त्या एका अधिसूचनेमुळे साळावली धरणाच्या चारही बाजूला असलेल्या सुमारे १५ खाण लीज बंद पडल्या आणि यातूनच म्हादई, जुवारीचे रक्षण झाले.
पत्रकारिता ही केवळ बातमी देण्यापुरती मर्यादित नसून समाजातील अन्यायाविरोधात लढण्याचे प्रभावी माध्यम आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे, असे केरकर म्हणाले. दिव्यांग व्यक्तींच्या प्रश्नांकडे लक्ष वेधताना न्या. मिनेझिस नमूद केले की, या क्षेत्रात अजूनही मोठ्या प्रमाणात काम करणे आवश्यक आहे. स्वयंसेवी संस्थांकडून मदत होत असली तरी कायदेशीर पातळीवर पुरेशा सुविधा उपलब्ध दिसत नाही. दिव्यांग व्यक्तींना नोकरी नाकारल्यास कायदेशीर सेवा प्राधिकरण यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या प्रकरणांची जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा द्यावा.
पर्यावरणाचे प्रश्न गंभीर : मिनेझिस
न्यायाधिश मिनेझिस यांनी सांगितले की, रामदास आठवले यांच्या स्वप्नांना लोकविश्वास प्रतिष्ठानने प्रत्यक्षात उतरविण्याचे काम केले आहे. राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. विशेषतः राज्यातील पर्यावरणाशी संबंधित प्रश्न गंभीर बनत चालले असून काही हितधारकांकडून पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत केरकर यांनी निर्भीडपणे महत्त्वाचे मुद्दे मांडले असून त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा.
'आईने खूप सहन केले'
तत्कालिन संपादक नारायण आठवले यांनी माझ्यातील लेखकाला जागे करून व्यासपीठ दिले. सुरुवातीलाच गावातील जुगार, मटका याविषयी बातम्या, खाण व्यवसाय व वाळू माफियाांवर लिहिले. यातून अनेकदा माझ्याच गावातील लोक घरी मला मारायला यायचे. माझ्या या पत्रकारितेमुळे माझ्या आईला खूप मनस्ताप सहन करावा लागला. पण त्यावेळी आठवले आणि पत्रकारबंधू माझ्या बाजूने राहिले, असे केरकर यांनी सांगितले.