सरकारकडून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:18 IST2026-04-29T13:17:35+5:302026-04-29T13:18:25+5:30
नावेली पंचायत कार्यालयात आयोजित महा लोन मेळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सरकारकडून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: राज्य सरकार महिलांच्या सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून 'महा लोन मेळा' हा उपक्रम केवळ कर्जवाटपाचा कार्यक्रम नसून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. महिलांच्या प्रगतीतूनच समाज आणि राज्याचा सर्वागीण विकास होतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
राज्य ग्रामीण आजीविका अभियानांतर्गत आयोजित 'महा लोन मेळ्याचे' उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते नावेली पंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सरपंच नारायण गावस, पंचायत सदस्य सचिव, विविध बँका व वित्तीय संस्थांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सहाय्य आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमात स्थानिक प्रतिनिधी, बँक अधिकारी, स्वयं-सहायता गटांच्या महिला सदस्यांचा मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की आजच्या काळात महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता विविध क्षेत्रांमध्ये पुढे येणे आवश्यक आहे. सरकार त्यांना आवश्यक आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी कटिबद्ध आहे. शिवणकाम, अन्न प्रक्रिया, दुग्धव्यवसाय आणि शेती यासारख्या क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात संधींचा लाभ घ्यावा.
मुख्यमंत्री म्हणाले, की जेव्हा महिला प्रगती करतात, तेव्हा गोवा प्रगती करतो. महिलांच्या प्रगतीतूनच समाज आणि राज्याचा सर्वांगीण विकास साध्य होईल. मेळ्याद्वारे महिलांना सुलभ कर्ज, तांत्रिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेतील संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण उद्योजकतेला चालना मिळून महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढणार आहे, असे आयोजकांनी यावेळी सांगितले.
'ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना'
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना 'ऑन-द-स्पॉट' कर्ज मंजुरी, तांत्रिक सल्ला आणि बाजारपेठेशी थेट जोड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करणे आणि वाढविणे अधिक सुलभ होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मजबूत संस्थात्मक पाठबळ आणि वित्तीय साक्षरतेमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे. ग्रामीण भागात उद्योजकतेला चालना देऊन राज्याच्या आर्थिक विकासात महिलांचा मोठा वाटा निर्माण होईल.