चित्ररथातून सामाजिक समतेचा जागर

By Admin | Updated: February 5, 2016 01:02 IST2016-02-05T01:02:27+5:302016-02-05T01:02:27+5:30

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न सत्यात ...

Jagar of social equality in painting | चित्ररथातून सामाजिक समतेचा जागर

चित्ररथातून सामाजिक समतेचा जागर

देसाईगंज व आरमोरीत रॅली : शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक न्यायाचा संदेश
देसाईगंज/आरमोरी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी तसेच सामाजिक न्यायाचा जागर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या पर्वावर विद्यार्थ्यांनी देसाईगंज व आरमोरी येथे समता रॅली, चित्ररथ काढून सामाजिक समता व न्यायाचा संदेश गुरूवारी दिला.
डॉ. बाबासाहेब यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त २०१५- १६ हे वर्ष समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने काढलेल्या रॅलीत विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
देसाईगंजात आदर्श महाविद्यालयाच्या प्रांगणात उपप्राचार्य डॉ. एच. एम. कामडी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी समाजकल्याण विभागाचे शिवाजी पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्रीराम गहाणे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. रमेश धोटे, प्रा. डॉ. जयदेव देशमुख, प्रा. डॉ. राजू चावके उपस्थित होते. रॅली शहरातील हुतात्मा स्मारक, बसस्थानक, फवारा चौक मार्गाने काढण्यात आली. दरम्यान विद्यार्थ्यांनी सामाजिक समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठीचे संदेश देणारे पथनाट्य सादर केले.
देसाईगंज तालुक्यातील कुरूड, कोंढाळा येथे समता रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य रेखा मडावी, पं. स. उपसभापती नितीन राऊत, कुरूडचे सरपंच मारोती मडावी, मंगला शेंडे, पोलीस पाटील किरण कुंभलवार, कमलेश उके, दिगांबर मेश्राम, नागोराव उके, राजेंद्र शेंडे, श्रीरामे, आंभोने, प्राचार्य उल्हास अंबोरे, जयंत राऊत उपस्थित होते. शिवाजी पाटील, आशिष नंदेश्वर यांनी रॅलीचा उद्देश, महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितला. विजय शेंडे यांनी भीमगीतांचे गायन केले. संचालन पृथ्वीराज डांगे तर आभार जयपाल बन्सोड यांनी मानले.
मोहसीनभाई कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. पंकज चौधरी, प्रा. नाजीम शेख, डॉ. कुशल लांजेवार, डॉ. चंद्रकांत शेंडे, प्रा. कुणाल हिवसे, सतीश मेश्राम उपस्थित होते. चित्ररथाद्वारे समता, बंधूता, न्याय, सामाजिक, शैक्षणिक, राजनैतिक बाबींचा जागर करण्यात आला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने काढलेल्या समता संदेश चित्ररथाचे स्वागत आरमोरी येथे तहसीलदार मनोहर वलथरे, नायब तहसीलदार चन्नावार यांनी केले. त्यानंतर नवीन बसस्थानकाजवळ चित्ररथाचे आगमन होताच जि. प. सदस्य लक्ष्मी मने, पं. स. सभापती सविता भोयर, पं. स. सदस्य नम्रता टेंभुर्णे, रेखा कन्नाके, मुख्याध्यापक साईनाथ अद्दलवार, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. शशिकांत गेडाम, हंसराज बडोले, वासनिक, कल्पना तिजारे, भीमराव ढवळे व शेकडो नागरिक, विद्यार्थ्यांनी चित्ररथाचे स्वागत केले. विजय शेंडे व त्यांच्या चमूने बाबासाहेबांचे विचार व त्यांच्या कार्याची माहिती भीमगीतातून दिली. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Jagar of social equality in painting