धान भरडाई थांबल्यामुळे खरेदीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:37+5:30
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड (प्रोटिनयुक्त प्रक्रिया केलेला) तांदूळ नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी लागणारा महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल तांदूळ भरडाई केला जात आहे. मात्र इतर जिल्ह्यांना तांदूळ पुरवण्यासाठी संबंधित जिल्ह्यांकडून अद्याप मागणीच झालेली नसल्यामुळे त्यांसाठी धानाची भरडाई करून तो तांदूळ सुरक्षित कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून शासनाच्या हमीभावानुसार खरेदी केलेल्या धानाची भरडाई होत नसल्यामुळे खरेदी केंद्रांवर आता धान ठेवणे कठीण झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांकडून आणखी धान खरेदी करणे जवळजवळ अशक्य होऊन अनेक ठिकाणची धान खरेदी ठप्प झाली आहे. यामुळे प्रशासनापुढे नवीन पेच निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड (प्रोटिनयुक्त प्रक्रिया केलेला) तांदूळ नागरिकांना दिला जाणार आहे. त्यासाठी लागणारा महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल तांदूळ भरडाई केला जात आहे. मात्र इतर जिल्ह्यांना तांदूळ पुरवण्यासाठी संबंधित जिल्ह्यांकडून अद्याप मागणीच झालेली नसल्यामुळे त्यांसाठी धानाची भरडाई करून तो तांदूळ सुरक्षित कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी धान भरडाईचे काम जवळजवळ ठप्प झाले आहे.
यावर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या ८९ आणि मार्केटिंग फेडरेशनच्या १७ अशा एकूण १०६ केंद्रांवरून शेतकºयांकडील धानाची खरेदी झाली. त्यात महामंडळाने ७ लाख १५ हजार ७४७ क्विंटल तर मार्केटिंग फेडरेशनने २ लाख ४८ हजार ४४५ क्विंटल अशी एकूण ९ लाख ६४ हजार १९३ क्विंटल धान खरेदी केली. त्यापैकी जेमतेम १ लाख ९ हजार क्विंटल धान भरडाईसाठी देण्यात आला आहे. एकूण धान खरेदीच्या १२ ते १३ टक्केच धानाची भरडाई झाली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी केंद्रांच्या प्रांगणात धान पडून आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील तांदळाचा पुरवठा राज्यातील अनेक जिल्ह्यांना केला जातो. कोणत्या जिल्ह्यांना किती तांदळाची गरज आहे याची मागणी नोंदवून तसा पुरवठा करण्याचे नियोजन आतापर्यंत होणे अपेक्षित होते. परंतू संबंधित जिल्ह्यांच्या मागणीबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव आला नसल्याचे समजते. वास्तविक तशी मागणी आल्यास त्यानुसार धान भरडाईसाठी देऊन खरेदी केंद्रांवर आणखी धान ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होऊ शकते. मात्र तसे झाले नसल्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
फोर्टिफाईडवर तांदळावर भर
जिल्ह्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी स्वस्त धान्य दुकानांमधून फोर्टिफाईड तांदूळ देण्याचा निर्णय प्रशासनाने आधीच घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यात महिन्याकाठी ३७ हजार क्विंटल एवढ्याच तांदळाची गरज असते. साध्या तांदळावर प्रक्रिया करून त्याला फोर्टिफाईड बनविण्यासाठी १० राईस मिलर्सना कंत्राट दिला आहे. त्यामुळे या तांदळाशिवाय बाहेरगावी तांदूळ पुरविण्यासाठी अद्याप आदेश मिळाला नसल्यामुळे त्या धानाची भरडाई ठप्प आहे.