वनकर्मचाऱ्यांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 06:00 AM2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:23+5:30
आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१७ मध्ये आपण आलापल्ली वन विभागात रूजू झाले त्यावेळी आपला स्वभाव अतिशय शांत होता. त्यामुळे कार्यालयात आनंदी वातावरण राहत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : येथील उपवन संरक्षक चंद्रकांत तांबे अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप करून आलापल्ली वन उपवनसंरक्षक कार्यालयातील सर्वच कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सदर आंदोलन बुधवारी सुध्दा कायम राहणार आहे. या आंदोलनाला जिल्हाभरातील इतरही वन कर्मचाऱ्यांनी समर्थन दर्शविले आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत वन कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने अधिकाऱ्यांवरील दबाव वाढला आहे.
आलापल्ली उपवनसंरक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर २०१७ मध्ये आपण आलापल्ली वन विभागात रूजू झाले त्यावेळी आपला स्वभाव अतिशय शांत होता. त्यामुळे कार्यालयात आनंदी वातावरण राहत होते. परिणामी प्रशासकीय कामे वेळेवर व उत्तमरित्या होत होती. आपणास भारतीय वनसेवेचा अवॉर्ड देण्यात आला. त्यानंतर मात्र आपल्या स्वभावात फार मोठा बदल पडला आहे. कार्यालयातील कक्ष प्रमुखांसह इतर कर्मचाऱ्यांनाही आपणाकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. यामुळे कार्यालयीन कर्मचारी त्रस्त झाले आहेत. स्वभावात बदल करावा, असा सल्ला तांबे यांना निवेदनातून देण्यात आला.
निवेदन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र चर्चेतून सकारात्मक उत्तर निघू शकले नाही. त्यामुळे ३ वाजतानंतर उपवनसंरक्षक कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांनी सामुहिक सुटीचा अर्ज टाकला.
त्यामुळे दुपारनंतर संपूर्ण कार्यालय ओस पडले होते. या आंदोलनाला बुधवारपासून भामरागड, सिरोंचा, गडचिरोली, देसाईगंज या उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या कार्यालयातील कर्मचारी तसेच वनरक्षक व वनपाल सुध्दा समर्थन दर्शविणार आहेत.