राज्यबंदीने हिरावला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : राज्याच्या अंतिम टोकावर असलेल्या सिरोंचाची सीमा तेलंगणा व छत्तीसगड राज्याला लागून आहे. या सीमेवरच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : राज्याच्या अंतिम टोकावर असलेल्या सिरोंचाची सीमा तेलंगणा व छत्तीसगड राज्याला लागून आहे. या सीमेवरच प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्या आहेत. या नद्यांमधून अनेकजण डोंग्याने आवागमन करायचे. परंतु लॉकडाऊनमुळे डोंगा व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला. या व्यावसायिकांनी पर्यायी व्यवसाय शोधला असून त्यावरच ते कुटुंबाची उपजीविका चालवत आहेत.
महाराष्ट्राच्या अंतिम टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्याला लागूनच प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्या वाहतात. सीमेला लागून असलेल्या तेलंगणा, छत्तीसगड राज्यात सिरोंचा तालुका वासीयांचे रोटी, बेटीचे संबंध आहेत. त्यामुळे तिन्ही राज्यातील नागरिक आवागमन करतात.
पुलाअभावी गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांचे आवागमन सुरू आहे. सध्या तिन्ही नद्यांवर सिरोंचा व अहेरी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी पुलाचे बांधकाम झाले असले तरी नदी लगतच्या लोकांना फेरा मारून पुलावरून लांबलचक जाण्यापेक्षा शॉर्टकट नदीतून डोंग्याने प्रवास करणे आवडते. हा प्रवास धोकादायक वाटत असला तरी अंगवळणी पडल्याने अनेकजण नदीतून डोंग्याने प्रवास करतात. त्यामुळे स्थानिक डोंगा चालकांना रोजगार मिळायचा. परंतु लॉकडाऊनमुळे जिल्हा व राज्याच्या सीमाबंद करण्यात आल्या. आकस्मिक स्थितीत तसेच स्थलांतरित मजुरांनाच सीमा पार करून येण्याची परवानगी मिळाल्याने प्रवाशी मिळेनासे झाले. त्यामुळे सध्यास्थिती घाट निर्मनुष्य दिसत आहेत.
तीन घाटावरून वाहतूक
सिरोंचा तालुक्यात सिरोंचा, पातागुडम, नगरम आदी तीन घाटावरून नदीतून डोंग्याने प्रवास करून दुसऱ्या राज्यातील निश्चित गाव गाठले जायचे. अनेक डोंग्यांमध्ये ४० ते ५० लोकांना बसवून नेण्याची क्षमता होती. दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत डोंगे चालायचे. परंतु आता डोंगे नदीच्या काठाला बांधून ठेवले आहेत.