माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! 'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड
By संजय तिपाले | Updated: April 26, 2026 11:07 IST2026-04-26T11:06:59+5:302026-04-26T11:07:12+5:30
Gadciroli News: दशकानुदशके जंगलात बंदुकीच्या जोरावर 'सशस्त्र क्रांती'चे स्वप्न पाहणाऱ्या माओवादी संघटनेला आता घरघर लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संघटनेचा एकेकाळचा सर्वोच्च नेता 'देवजी' याने शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याने बिथरलेल्या माओवाद्यांच्या तेलंगणातील उत्तर तालमेल कमेटीने (एनसीसी) पत्रक काढून आगपाखड केली आहे.

माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! 'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड
गडचिरोली - दशकानुदशके जंगलात बंदुकीच्या जोरावर 'सशस्त्र क्रांती'चे स्वप्न पाहणाऱ्या माओवादी संघटनेला आता घरघर लागल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. संघटनेचा एकेकाळचा सर्वोच्च नेता 'देवजी' याने शस्त्रे खाली ठेवून मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतल्याने बिथरलेल्या माओवाद्यांच्या तेलंगणातील उत्तर तालमेल कमेटीने (एनसीसी) पत्रक काढून आगपाखड केली आहे. देवजीला गद्दार ठरवत माओवाद्यांनी आपल्यातील सशस्र क्रांतीचा पुनरुच्चार केला आहे.
माओवाद्यांचे १७ एप्रिल रोजीचे पत्रक २६ रोजी समोर आले. पत्रकात देशातील दोन राजकीय रेषांमधील संघर्ष अधोरेखित करत मार्क्स-लेनिन-माओ विचारसरणीवर आधारित सशस्त्र संघर्ष हाच योग्य मार्ग असल्याचा दावा करण्यात आला आहे. देवजी, कोबाड, वेणुगोपाल यांना दुश्मनांचे एजंट ठरवत त्यांच्यावर तीव्र टीका करण्यात आली आहे. भूमिगत पक्षाला कायदेशीर चौकटीत आणणे म्हणजे पक्षाचा अंतच, असे म्हणत देवजीने मांडलेली लोकशाहीची भूमिका त्यांना अमान्य असल्याचे म्हटले आहे. देवजी सोबतच जनतेच्या सशस्त्र शक्तीशिवाय क्रांती शक्य नाही, असे म्हणत त्यांनी छापामार युद्धाद्वारे जनआंदोलन मजबूत करण्याचा दावा केला आहे.
सुरक्षा यंत्रणांचा ‘वॉच’ वाढला
या पत्रकानंतर गडचिरोली पोलिस दलाने कोणतीही जोखीम न पत्करता 'हायअलर्ट' जारी केला आहे. विशेषतः अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या तेलंगणा-छत्तीसगड सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि गस्त वाढवण्यात आली आहे. माओवाद्यांच्या या धमकीवजा पत्रकाचा प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिस दल सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नेपाळच्या चळवळीचा दाखला
नेपाळमधील कम्युनिस्ट चळवळ ज्याप्रमाणे मूळ वामपंथी विचारांपासून दूर गेली, तसाच प्रयत्न भारतातही सुरू असल्याचा संशय नक्षल्यांनी व्यक्त केला आहे. क्रांतीचा मार्ग सोडून लोकशाहीच्या वाटेवर जाणे म्हणजे चळवळीचा घात असल्याचे पत्रात नमूद आहे.
बसवाराजू , हिडमाची आठवण
कार्ल मार्क्स, लेनिन, चारु मुजुमदार, बसवाराजू, राजू दा, कोसा दा आणि हिडमा या नेत्यांनी प्राणांची आहुती दिली पण कधी तडजोड केली नाही. मात्र, देवजीसारख्यांनी 'राजकीय लाईन' सोडून स्वतःच्या बचावासाठी शरणागती पत्करली, अशी बोचरी टीका संघटनेने केली आहे. भूमिगत राहून लढा देण्याऐवजी कायदेशीर चौकटीत जाणे हा 'विघटनवाद' असून, अशा लोकांमुळे क्रांतिकारी चळवळ कमकुवत होणार नाही, असा दावा केंद्रीय कमिटीने केला आहे.