ऐन दिवाळीत एटापल्ली येथील पाणीपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 05:00 AM2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:48+5:30
१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटापल्लीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : ऐन दिवाळीच्या कालावधीत एटापल्ली येथील पाणीपुरवठा योजना बंद पडली आहे. त्यामुळे एटापल्लीवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
१० हजार लोकसंख्या असलेल्या एटापल्ली शहराला डुम्मी नाल्यावरून पाणीपुरवठा केला जातो. डुम्मी नाल्यावर विहीर खोदण्यात आली आहे. या विहिरीचे पाणी गावातील टाकीमध्ये टाकून पाणीपुरवठा केला जातो. दिवाळीच्या सणाची धामधूम सुरू असतानाच सहा दिवसांपूर्वी अचानक एटापल्लीचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नळ योजना बंद असल्याबाबत नगर पंचायतीचे अभियंता नंदनवार यांना विचारणा केली असता, मोटार नादुरूस्त असल्याने पाणीपुरवठा बंद आहे. दोन दिवसात मोटार सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले.
नळांद्वारे पाणीपुरवठा ज्या दिवशी होत नाही, त्या दिवशी महिला हातपंपाचे पाणी भरतात. मात्र एटापल्ली नगर पंचायतीने हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले असल्याने अनेक हातपंप बंद आहेत, असा आरोप मनोज वरगंटीवार यांच्यासह नागरिकांकडून होत आहे. आठ वर्षांपूर्वी योजना बांधण्यात आली. त्यानंतर शहराचा विस्तार दरवर्षी होत आहे. नवीन वस्त्या वाढत आहेत. मात्र या नवीन वस्त्यांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली नाही.
एटापल्ली नगर पंचायतीअंतर्गत एटापल्ली टोला, कृष्णार, जीवनगट्टा, मरपल्ली, वासामुंडी या गावांचा समावेश होतो. मात्र या गावांना नळ योजनेची सुविधा उपलब्ध नाही. केवळ एटापल्ली शहरालाच नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. विशेष म्हणजे एटापल्ली येथे ग्रामपंचायत असताना पाणीपुरवठा योजना बांधण्यात आली. नगर पंचायतीची निर्मिती होेऊन आता पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी होत चालला आहे. मात्र या योजनेत कोणतीही सुधारणा करण्यात आली नाही. डुम्मी नाल्यावरच दोन विहिरी खोदल्या आहेत. मात्र मोटार बसविणे, विद्युत पुरवठा आदी कामे करण्यात आली नाही. ज्या विहिरीतून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे ती विहीर आकाराने लहान आहे. पाणी पुरत नसल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.
बांडे नदी भागवू शकते अनेक गावांची तहान
बांडे ही एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी अनेक गावांना वळसा घालून पुढे जाते. विशेष म्हणजे जंगलातून वाहत असल्याने या नदीला बारमाही पाणी राहते. एटापल्लीपासून ही नदी जेमतेम पाच किमी अंतरावर आहे. या नदीवर पाणीपुरवठा योजना तयार केल्यास एटापल्लीसह तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांची तहान भागू शकते. सर्वांसाठी एक संयुक्त पाणीपुरवठा योजना बांधल्यास ती यशस्वी होऊ शकते.