जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे ४६ कोटींची थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 06:00 AM2019-11-29T06:00:00+5:302019-11-29T06:00:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा करावा, यासाठी शासनाने सवलतीच्या विविध योजना राबविल्यानंतरही जिल्ह्यातील जवळपास १९ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शेतकऱ्यांनी वीज बिलाचा भरणा करावा, यासाठी शासनाने सवलतीच्या विविध योजना राबविल्यानंतरही जिल्ह्यातील जवळपास १९ हजार शेतकऱ्यांकडे ४५ कोटी ८९ लाख ३१ हजार १९६ रुपयांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती असताना अद्याप शेतकऱ्यांकडून वीज बिलाची थकबाकी सक्तीने वसूल न करण्याबाबत कोणताही आदेश मिळालेला नाही.
गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. मामा तलाव, बोड्यांच्या माध्यमातून खरीप हंगामातील धानपिकाला आकस्मिक स्थितीत सिंचन उपलब्ध होते. सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन विहिरी, शेततळे उपलब्ध करून दिले. विहिरींमध्ये कृषिपंप लावून सिंचन करण्यासाठी वीज पुरवठा व कृषिपंपांची मागणी वाढली. शासनानेही शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी त्यांच्या शेतापर्यंत वीज खांब नेऊन पोहोचले. परंतू त्या वीज बिलाची रक्कम नियमितपणे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १९ हजार ८१४ वीज कृषिपंपधारक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना शासनामार्फत अत्यंत कमी दरात वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाते. जिल्हाभरातील शेतकरी दर तीन महिन्याला जवळपास सव्वा कोटी युनिट विजेचा वापर करतात. तीन महिन्याचे बिल जवळपास तीन ते साडेतीन कोटीच्या जवळपास राहते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे जुनी थकबाकी ३४ कोटी ८५ लाखांवर पोहोचली आहे. शेतकºयांनी थकीत वीज बिल भरावे, यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या. मात्र शेतकऱ्यांकडे थकीत वीज बिल कायम आहे. उलट वीज बिलाचा आकडा वाढतच चालला आहे. भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
नव्याने सत्तारूढ महाराष्ट्र आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काय-काय करणार याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात वीज देण्यासोबतच शेतमालाला भाव देण्याची गरज व्यक्त होत आहे.
व्याज पोहोचले ११ कोटींवर
महावितरणच्या नियमानुसार वीज बिल थकीत असेल तर त्यावर काही प्रमाणात व्याज आकारले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे सप्टेंबर महिन्यापर्यंत सुमारे ३४ कोटी ८५ लाख २१ हजार रुपयांची थकबाकी होती. या थकबाकीवर सुमारे ११ कोटी ४ लाख ९ हजार रुपयांचे व्याज झाले आहे. काही शेतकऱ्यांनी मागील तीन ते चार वर्षांपासून वीज बिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडील थकबाकी व त्यावरील व्याज वाढतच चालला आहे.
दुष्काळामुळे वीज बिल वसुली रखडली
खरीप हंगामातील धानपीक भरण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने धानपिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा थकीत वीज बिलासाठी वीज पुरवठा खंडित करणे योग्य होणार नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्याचे धोरण काही काळ लांबणीवर टाकले असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र जे शेतकरी वीज बिल भरणार आहेत, त्यांच्याकडून वीज बिल स्वीकारले जाणार आहे.