‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 13:06 IST2026-04-28T13:05:42+5:302026-04-28T13:06:23+5:30
पालकांनी अंतिम यादीची वाट न पाहता सध्याच्या मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा. अन्यथा उपलब्ध जागाही गमावण्याची शक्यता आहे.

‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
मुंबई - ६ एप्रिल रोजी आरटीई अंतर्गत लॉटरी काढल्यानंतर १० एप्रिलला निवड यादी जाहीर झाली, तरीही अनेक पालकांचा संभ्रम अद्याप कायम आहे. आवडीची शाळा न मिळाल्याने हजारो पालक ‘तळ्यात-मळ्यात’ स्थितीत आहेत. दरम्यान, प्रवेशप्रक्रियेसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असली तरी अपेक्षित प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.
मुंबई जिल्ह्यात यंदा आरटीई अंतर्गत मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष प्रवेशांची संख्या त्यामानाने कमी असल्याचे चित्र आहे. एकूण १०,३८३ अर्ज आले असून, ६,०२३ जागा राखीव आहेत. तसेच ३,०२७ प्रवेश पूर्ण झाले असून ६,०२३ जागा रिक्त आहेत. लॉटरीत नाव लागूनही अनेक पालकांना त्यांच्या पसंतीची शाळा मिळालेली नाही. परिणामी, प्रवेश घ्यावा की अंतिम यादीची वाट पाहावी, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काही पालक अंतिम यादीत चांगली शाळा मिळेल या आशेवर थांबले असल्याचे चित्र आहे.
‘एसएमएस’ची वाट पाहू नका, प्रक्रिया पूर्ण करा’
एसएमएस येण्याची वाट पाहू नका,ऑनलाइन पोर्टलवर नियमित तपासणी करा,अंतिम यादी येईपर्यंत थांबू नका, निवड झालेल्या पालकांनी ही प्रक्रिया पूर्ण करा. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरीत क्रमांक लागला आहे, त्या पालकांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पालकांनी अंतिम यादीची वाट न पाहता सध्याच्या मिळालेल्या शाळेत प्रवेश निश्चित करावा. अन्यथा उपलब्ध जागाही गमावण्याची शक्यता आहे.