राजकारण बेभरवशाचा खेळ! कोण जिंकणार? आकडे की चमत्कार?

By यदू जोशी | Published: June 10, 2022 09:24 AM2022-06-10T09:24:45+5:302022-06-10T09:25:55+5:30

राजकारण बेभरवशाचा खेळ आहे. जीभ दुसऱ्याच्या नाही तर आपल्याच दातांनी चावली जात असते. भरवशाच्या म्हशीला टोणगं तर नाही होणार?

Who will win Numbers or miracles? | राजकारण बेभरवशाचा खेळ! कोण जिंकणार? आकडे की चमत्कार?

राजकारण बेभरवशाचा खेळ! कोण जिंकणार? आकडे की चमत्कार?

googlenewsNext

- यदु जोशी
(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)

राज्यसभेची शुक्रवारी होणारी निवडणूक आणि २० जून रोजी होणारी विधान परिषदेची निवडणूक ही उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य ठरवेल. या दोन्ही निवडणुकांत महाविकास आघाडीची सरशी झाली तर सरकारला पुढची अडीच वर्षे कुठलाही धोका नसेल. भाजपच्या सर्व इच्छा-आकांक्षांवर पाणी फेरले जाईल; पण चमत्कार झाला तर सरकार निश्चितपणे अडचणीत येईल.  ठाकरे यांच्यासाठी १० जून आणि २० जूनला कठीण पेपर आहेत. बारावीचा निकाल तर ९५ टक्के लागला; पण  निवडणुकीच्या पेपरात आऊट ऑफ मार्क मिळविण्याचा आत्मविश्वास शिवसेनेला आहे. दुसरीकडे राज्यसभेला तिसरा अन् विधान परिषदेला सहावा उमेदवार देऊन देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकीय आयुष्यातील आजवरची सर्वात मोठी खेळी खेळत आहेत. त्यात ते जिंकले तर त्यांच्या बंगल्याचा पत्ता बदलू शकतो. हरले तर सागरात तळमळत राहतील.

समाजवादी पार्टी, बच्चू कडूंचे दोन आमदार, लहान-मोठे पक्ष, अपक्षांचे १३ आमदार महाविकास आघाडीच्या खेम्यात दिसत आहेत, समर्थनाचा आकडा वाढत चालला आहे; पण राजकारण बेभरवशाचा खेळ आहे. जीभ दुसऱ्याच्या नाही तर आपल्याच दातांनी चावली जात असते. भरवसा तुटण्याचा आवाज येत नसतो; पण जखम खोल होते. भरवशाच्या म्हशीला टोणगं तर नाही होणार? अनिल देशमुख, नवाब मलिकांना कोर्टाने मतदानाचा हक्क नाकारल्यानं महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं आहे. शुक्रवारी हायकोर्टात काय होते, ते पाहायचे!
एकनाथ शिंदे, अनिल परब या बिनीच्या शिलेदारांनी ‘अर्थ’पूर्ण तजवीज केल्याचं सांगितलं जात आहे.

कोटीच्या कोटी उड्डाणं दोन्हीकडून घेतली जात आहेत म्हणतात.  निकालापर्यंत सगळ्यांची धाकधूक राहील. महाविकास आघाडीचं राज्यसभेचं गणित बिघडलं तर विधान परिषदेत पोळा फुटेल. कारण १० तारखेचा पेपर खुला आहे अन् २० तारखेची परीक्षा गुप्त मतदानाची आहे. प्रत्येक जण विचारत आहे की भाजपचं गणित काय आहे? कशाच्या भरवशावर त्यांनी तिसरा अन् सहावा (व छुपा सातवा) गडी उतरवला आहे? आकड्यांचा सध्याचा खेळ महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे अन् चमत्काराची शक्यता भाजपच्या बाजूनं. 

आकडे जिंकतील की चमत्कार? लढाई आर या पारची आहे. तिसरी जागा जिंकण्याचं प्रेशर दिल्लीहून राज्यातील भाजपच्या नेत्यांवर आहे. गोवा जिंकलं म्हणून फडणवीस हिरो झाले, उद्याच्या दोन्ही निवडणुका जिंकून दाखवल्या तर ते सुपर हिरो होतील. दुसरीकडे महाविकास आघाडीनं बाजी मारली तर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक काँग्रेस आरामात जिंकेल. उद्धव ठाकरेंची मांड आणखी पक्की होईल.

राज्यसभा महाविकास आघाडीच जिंकेल; पण विधान परिषदेत मोठा दगाफटका होईल, असाही तर्क दिला जात आहे. दाखवून मतदान करायचं असल्यानं मोठ्या पक्षांच्या आमदारांची मत फुटणार नाहीत, या भ्रमात कोणी राहू नका. भाजप मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.  ज्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदार थांबले आहेत, त्यांच्या भिंतीना कान असतील तर कळेल. भाजपचं सॉफ्ट टार्गेट काँग्रेस राहू शकते. फास्ट धावण्याच्या नादात भाजपचा ट्रॅक सुटू नये एवढंच. पहाटेचा शपथविधी फसला होता, त्याला अडीच वर्षे झाली. आताचा प्रयोग फसला तर विरोधी बाकावर ‘फेविकॉल का जोड’ लावून बसावं लागेल. परीक्षा फक्त ठाकरेंचीच नाही फडणवीसांचीदेखील आहे.

देसाईंना फटका कशाचा? 
सुभाष देसाई यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारली. मातोश्रीवरील त्यांच्या वजनाचा टक्का संजय राऊत यांनी खाल्लेला दिसतो. देसाईंचं योगदान मोठं आहे. मातोश्रीशी निष्ठा हा त्यांचा गुण.  बारामतीत पाऊस पडला म्हणजे ते गोरेगावात छत्री उघडत नाहीत. मातोश्रीवर पाऊस पडला अन् जगात कुठेही असले तरी त्यांना भिजल्यासारखं होतं. आता ते सल्लागार मंडळात जाताहेत. त्यांना संधी देऊन मंत्रिपद टिकवलं तर तरुण आमदारांमधून नाराजीचे सूर उमटतील की एकट्या देसाईंचेच लाड का म्हणून? रावते, रामदास कदमांना तोच न्याय का नाही, असे प्रश्न विचारले गेले असते म्हणून त्यांचा पत्ता कट केला असेल कदाचित.  शिवसेनेत नव्यांना संधी तरी मिळते; पण राष्ट्रवादीचं काय? वर्षानुवर्षे खुर्च्या उबवणाऱ्या मंत्र्यांबाबत राष्ट्रवादीच्या तरुणच नाही तर पन्नाशी पार केलेल्या आमदारांमध्येही खदखद आहे. त्यांच्या घडाळ्यातील  नाराजीचा अलार्म साहेबांना ऐकू जात नाही.

पंकजाताईंची गडबड काय झाली? 
भाजपनं पंकजा मुंडे यांना पुन्हा डावललं म्हणून खूप चर्चा झाली; पण नेमकी माशी कुठं शिंकली? भाजपचे काही नेते आता असं बोलत आहेत की मला विधान परिषदेत घेणार असाल तर विरोधी पक्षनेतेपददेखील द्या, अशी पंकजाताईंची अट होती. ती वर मान्य झाली नाही. मोदी-शहांच्या राजकारणात अशा अटीबिटी चालत नाहीत, हे पंकजाताईंना चांगलंच ठाऊक असणार. त्यामुळे त्यांनी अटफट टाकली असेल, असं नाही वाटत. पंकजाताईंनी तरी विधान परिषदेवर का जावं? त्यांचा दरवाजा विधानसभेचा आहे. मागचा दरवाजा कशासाठी? लोकनेत्यानं विधान परिषदेवर जाण्यासाठी त्या खडसे थोडेच आहेत? अमिताभनं अमिताभच राहिलं पाहिजे.

Web Title: Who will win Numbers or miracles?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.