समाज परिवर्तनासाठी समर्पित आयुष्याची समिधा !

By विजय दर्डा | Updated: May 3, 2026 08:21 IST2026-05-03T08:20:23+5:302026-05-03T08:21:40+5:30

साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. यांचे देवलोक गमन झाले आहे. सामाजिक क्रांतीच्या दिशेने समाजाला प्रवृत्त करणाऱ्या साध्वीजींना विनम्र नमन !

Special Article A life dedicated to social change | समाज परिवर्तनासाठी समर्पित आयुष्याची समिधा !

समाज परिवर्तनासाठी समर्पित आयुष्याची समिधा !

डॉ. विजय दर्डा

चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

जैन समाजाप्रमाणेच हिंदूंसह अन्य धर्मीयांमध्ये लाखोंच्या संख्येने अनुयायी असलेल्या, तसेच केवळ धार्मिक प्रवचनेच नव्हे तर समाज सुधारणा आणि सामाजिक क्रांतीच्या दिशेने समाजाला प्रवृत्त करणाऱ्या थोर जैन साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. यांचे संथारा व्रत ग्रहण केल्यानंतर देवलोक गमन झाले. ही केवळ जैन समाजाचीच नव्हे, तर समस्त देशवासीयांची अपरिमित हानी आहे. लौकिक अर्थाने जैन श्रमण संघाचे आचार्यश्री हे पद त्यांना प्राप्त झाले नसले, तरी समस्त समाजमनात अनेक दशकांपासून एका अर्थाने त्या आचार्य पदावरच स्थानापन्न होत्या.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतच्या सोनी कुटुंबात साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. यांचा जन्म झाला. बालवयापासूनच त्यांच्यात वैराग्याची प्रेरणा होती. आयुष्यभर हजारो प्रवचनांतून, भजनांतून जैन स्थानकांमधील लोकसंपर्कातून समाजसुधारणेचे सूत्र त्यांनी कायम ठेवले होते. जैन धर्माच्या प्रवचनांखेरीज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवर वारकरी संप्रदायासह सर्वधर्मीय बांधवांसमोर त्यांनी जाहीर प्रवचने दिली आहेत. साहजिकच त्यांचे कर्तृत्व एक धर्म अथवा संप्रदायापुरते मर्यादित न राहाता त्यांनी समस्त भारतवासीयांनाच सत्कर्मासाठी प्रवृत्त केले. त्यांच्या प्रवचनांच्या प्रभावामुळे अनेक कुटुंबातील भावाभावातले, भावा-बहिणीतले वाद संपुष्टात आले. इतकेच नव्हे, तर माता-पित्यांना आपल्यापासून दूर ठेवणाऱ्या, वृद्धत्वात त्यांची काळजी न घेणाऱ्या अनेक मुलांनी त्यांची प्रवचने ऐकून स्वतःची चूक मान्य केली व आई-वडिलांना पुन्हा घरात मानाचे स्थान दिले, अशा शेकडो घटना आहेत. रूढ अर्थाने त्यांची प्रवचने धार्मिक होती, तरी त्यात सातत्याने सामाजिक आणि कौटुंबिक वीण घट्ट विणण्याचा धागा गुंफलेला असायचा. १९७३ मध्ये साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. यांची दिल्लीत रामलीला मैदानावर प्रवचने झाली. त्यावेळी त्या जैन धर्माचे थोर आचार्य सुशील मुनी यांच्या संपर्कात आल्या.

आचार्यजींनी साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. यांची मधुर वाणी आणि अर्थपूर्ण रसाळ प्रवचनांचे कौतुक केले. त्यानंतर, दीड दशकाने अमेरिकेतल्या जैन धर्मातल्या पुढच्या पिढीला देखील मार्गदर्शनाची गरज आहे, याची जाणीव करून देत आचार्य सुशीलमुनींच्या प्रेरणेनुसार सिद्धाचलम आश्रम, तसेच अमेरिकेतल्या विविध भागांत धर्मोपदेश व मार्गदर्शन करण्यास साध्वी मधुस्मिताजी व साध्वी जयस्मिताजी म.सा. या अमेरिकेत गेल्या. त्यानंतर, त्या भारतात परत आल्या, तेव्हा रूढी परंपरांना अधिक महत्त्व देणाऱ्या काही समाजबांधवांनी त्यांना जैन स्थानकात प्रतीकात्मक प्रवेशबंदी केली. साधू-साध्वींनी विदेशात जाणे, समुद्र ओलांडणे निषिद्ध मानणाऱ्या रूढीवादींच्या विरोधात त्यावेळी स्वरूपचंद राका, सुरेश भटेवरा, रमेशचंद बाफणा, बिरदीचंद नहार यांच्यासह काही अन्य समाज धुरिणांनी एकत्र येऊन एक चळवळ उभारली. जैन समाजात अलीकडच्या काळातली ही लक्षवेधी चळवळ ठरली. नाशिकमधील सत्कार सोहळ्यानंतर मिरवणुकीने दोन्ही साध्वी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे आशीर्वाद घेऊन पुन्हा अमेरिकेला रवाना झाल्या. कर्मठ रूढींना फाटा देण्याच्या या उपक्रमाला प्रीतीसुधाजी म.सा. यांचे अप्रत्यक्ष आशीर्वाद होते.

या चळवळीचा जैन समाजावर खूपच परिणाम झाला.

त्यानंतर, दोनच वर्षांनी १९९४ मध्ये नागपूरला मी पुढाकार घेऊन  साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. आणि साध्वी मधुस्मिताजी म.सा. व अन्य साध्वींचा अतिभव्य चातुर्मास आयोजित केला. सहसा एका व्यासपीठावर न येणाऱ्या जैन धर्मातल्या सर्व पंथांना त्या चातुर्मासाने एकत्र आणण्याचे मोठे कार्य केले. त्या चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या स्वागत समितीचे अध्यक्षपद नागपूरचे तत्कालीन महापौर सरदार अटलबहादुरसिंग या शीख बांधवाने भूषवले आणि भव्य मंडपाची जबाबदारी जाफरभाई नावाच्या मुस्लीम बांधवाने घेतली होती. वातावरण इतके भारावलेले होते की, तो पूर्ण काळ या दोघांनीही शाकाहारासह सर्व जैन संस्कारांचे पालन केले. या चातुर्मासाचे नाव होते ‘संस्कारयज्ञ’. जैन धर्मामध्ये वेगवेगळे पंथ आहेत. त्या सर्व पंथांच्या गुरू महाराजांनी आपापसातले संकेत बाजूला ठेवून एका व्यासपीठावर यावे; भगवान महावीर एकच आहेत; तर आपण सर्वांनी आपापल्या प्रथा-परंपरा आपापल्यापुरत्या ठेवून एकत्र यावे, असा आग्रह आम्ही धरला आणि याच चातुर्मासात ‘सकल जैन समाजा’ची स्थापना झाली. बैठकव्यवस्थेची चर्चा सुरू झाली, तेव्हा साध्वींना मुख्य मंचावर दुय्यम स्थान असते, असे मला सांगण्यात आले. मी ते अमान्य केले. या मंचावर आचार्यांच्या बरोबरच साध्वींनाही त्यांच्या ज्येष्ठतेनुसार उचित तेच मानाचे स्थान मिळेल, असा आग्रह धरला आणि तसे घडलेही. हस्तीमलजी फिरोदिया, नवलचंदजी फिरोदिया यांच्यासह अनेक ज्येष्ठ सदस्यांचा या सुधारणांना सक्रिय पाठिंबा होता आणि आम्हा सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या साध्वी प्रीतीसुधाजी म.सा.. चातुर्मासात झालेल्या त्यांच्या प्रत्येक प्रवचनाला त्यावेळी २० ते २५ हजारांचा जनसमुदाय येत असे. त्यात बहुसंख्य जैन धर्मीय असले, तरी निम्मे नागरिक अन्य सर्व धर्मातील होते. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव देखील या चातुर्मासात साध्वीजींची भेट घेण्यासाठी नागपूरला येऊन गेले. या चातुर्मासाची प्रवचने आकाशवाणीने प्रक्षेपित केली. त्या प्रवचनांचा जनसमुदायावर इतका प्रभाव पडला की त्या काळी रस्त्याने जाणाऱ्या ट्रकपासून बसपर्यंतच्या

वाहन चालकांना जैन साध्वी, साधू दिसले, तर ती वाहने ते थांबवायचे. साधू, साध्वींचे दर्शन घेऊन मगच ती वाहने मार्गस्थ व्हायची. त्यामागे साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. यांच्या प्रवचनांचे मोठे श्रेय होते.

शाकाहाराबाबत बोलताना तुमचे पोट म्हणजे प्राण्यांची दफनभूमी आहे का ? अशा स्पष्ट शब्दात त्या भूमिका मांडत असत. साधू आणि साध्वींनी केवळ धार्मिक प्रवचनांपुरते मर्यादित न राहता सामाजिक अनिष्ट रूढी दूर करण्यातही सक्रिय राहावे, असे सांगत. साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. यांच्या समकालीन आणि बिहारमध्ये राजगृही येथे वीरायतन नामक भव्य आश्रम उभारणाऱ्या पद्मश्री आचार्य साध्वी चंदनाजी यांच्या देवलोक गमनानंतर अवघ्या महिनाभरातच साध्वी प्रीतीसुधाजी म.सा. यांचे देवलोक गमन झाले. १९६० ते ७० च्या दशकात आणि त्यानंतर, जन्माला आलेल्या पिढ्यांची मने समृद्ध करण्याचे कार्य ज्यांनी केले, त्यात साध्वी प्रीतीसुधाजी म. सा. यांचे नाव खूप वरच्या श्रेणीत कायमच घेतले जाईल. त्यांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदना.

Web Title : साध्वी प्रीतिसुधा को श्रद्धांजलि: सामाजिक परिवर्तन को समर्पित जीवन।

Web Summary : साध्वी प्रीतिसुधा का निधन देश के लिए एक क्षति है। उन्होंने सामाजिक सुधार को प्रेरित किया, धार्मिक सीमाओं को पार किया। उनकी शिक्षाओं ने पारिवारिक विवादों को सुलझाया और करुणा को बढ़ावा दिया। आचार्य सुशील मुनि के साथ उनके काम और कठोर परंपराओं के खिलाफ वकालत ने जैन समुदाय को महत्वपूर्ण रूप से प्रभावित किया। नागपुर में एक चातुर्मास ने जैन संप्रदायों को एकजुट किया।

Web Title : Tribute to Sadhvi Preetisudha: A life dedicated to social change.

Web Summary : Sadhvi Preetisudha's passing is a loss for the nation. She inspired social reform, transcending religious boundaries. Her teachings resolved family disputes and promoted compassion. Her work with Acharya Sushil Muni and advocacy against rigid traditions impacted the Jain community significantly. A चातुर्मास (Chaturmas) in Nagpur united Jain sects.