विशेष लेख: अजितदादांनंतर महाराष्ट्राचे राजकारण कसे असेल?
By यदू जोशी | Updated: January 30, 2026 09:33 IST2026-01-30T09:32:40+5:302026-01-30T09:33:50+5:30
Ajit Pawar: अजितदादांचा धाक आणि त्यांची हाक हे सारेच गमावलेला त्यांचा पक्ष सैरभैर आहे. सरकार स्थिर असले, तरी सत्तासंतुलनाचा प्रश्न कळीचा ठरेल!

विशेष लेख: अजितदादांनंतर महाराष्ट्राचे राजकारण कसे असेल?
- यदु जोशी
(राजकीय संपादक, लोकमत)
अजितदादांच्या अकाली निधनाने खूप काही थांबल्यासारखे वाटत आहे, राजकारणही थांबल्यासारखे झाले असले तरी पुढच्या काळात ते त्यांच्याशिवाय पुढे जाणार हे सत्य त्यांच्या जीवलगांसह सर्वांनाच स्वीकारावे लागणार असून, ‘महाराष्ट्राचे यापुढचे राजकारण कसे असेल?’, याचा विचारही करावा लागणार. अजितदादांच्या जाण्याने आलेले रितेपण कसे भरून निघेल, त्यात कोणाची कुठे आणि कशी भूमिका असेल, हा पट मांडला जाणे अपरिहार्य आहे.
‘अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे भवितव्य काय असेल?’- हा सर्वांत कळीचा मुद्दा. पक्ष मजबूत; पण, नेताच उरला नाही, अशा बिकट अवस्थेत त्यांचा गट थांबला आहे. अर्थात, हे थांबलेपण प्रवाही होईलच, ते प्रवाही करण्यात कोणाकोणाच्या भूमिका महत्त्वाच्या असतील, याची उकलही लवकरच होईल. १) शरद पवार यांच्या नेतृत्त्वात पुढे जाणे २) आपल्यातीलच एकाला नेतृत्व देऊन पक्ष पुढे नेणे आणि शरद पवारांच्या सहकाऱ्यांना आपल्यात सामावून घेणे किंवा ३) शरद पवार यांनी आधीचीच भूमिका कायम ठेवली, तर त्यांना व त्यांच्या पक्षाला दूर ठेवून भाजपसोबतच राहणे, असे तीन ठळक पर्याय सध्या दिसतात.
अजितदादा भाजपसोबत गेले तरीही शरद पवार मात्र गेले नव्हते. नंतरच्या काळातही भाजपसोबत न जाण्याच्या भूमिकेवरच ते ठाम राहिले. आपली हीच भूमिका अजितदादा गेल्यानंतरही ते कायम ठेवतील का, यावर पुढचे बरेच काही अवलंबून असणार आहे. भाजप हा जातीयवादी / धर्माचे राजकारण करणारा पक्ष आहे, आपली विचारसरणी धर्मनिरपेक्षतेची आहे. त्यामुळे आपण भाजपसोबत जाऊ शकत नाही, असे शरद पवार वारंवार सांगत आले आहेत. मात्र, बदललेल्या परिस्थितीत मोठेच द्वंद त्यांच्यासमोर उभे राहील.
कारण, दोन्ही राष्ट्रवादींच्या राजकीय भवितव्याचाच प्रश्न नसून राजकारणावरील पवार घराण्याचे वर्चस्व पुढे कसे कायम ठेवायचे, हा त्याहून अधिक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच दोन्ही गट वेगवेगळे निर्णय / भूमिका न घेता एकमुखी निर्णय घेतील किंवा छोटा गट मोठ्या गटाला मूकसंमती देईल, अशी शक्यता अधिक आहे. (तसेही आधीच्या निर्णयांनादेखील अशीच मूकसंमती होती, असा तर्क अनेकजण वेळोवेळी देत असतातच.)
पर्याय येईल; पण पर्याय देईल का?
अजितदादांच्या जागी त्यांच्या पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल, त्यांच्या पक्षाकडून एकाला उपमुख्यमंत्रिपदही मिळेल म्हणजे दोन्हीकडे पर्याय येईल. पण जी कोणी व्यक्ती येईल तिने केवळ अजितदादांची जागा घेऊन पुरेसे होणार नाही, तर ती व्यक्ती सर्वांना दादांसारखे त्याच प्रेमाने आपल्या छत्रछायेखाली घेईल का, यावर पक्षाचे भवितव्य आणि एकसंधता निर्भर राहील. पर्याय मिळणे आणि सक्षम पर्याय देणे, या दोन वेगवेगळ्या गोष्टी. पक्षाचे व्यवस्थापन करायला माणसे असतात, पण नेतृत्व कोणा एकाचेच असते. अजितदादांच्या वैयक्तिक करिष्म्यामुळे सर्वच जातीधर्मांमधील तरुणवर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला होता. तशा क्षमतेचा एकही नेता नसणे, ही त्यांच्या पक्षासमोरची सर्वांत मोठी समस्या आहे. दादांचा धाक आणि त्यांची हाक याचे महत्त्व जाणवत राहील. दादांशिवाय सैरभैर झालेल्या पक्षातील नेत्यांना आश्वासक नेतृत्त्वाची नितांत गरज आहे. पवारांना पवारांमधूनच पर्याय लगेच दिला तर भावनिक बंध टिकेल.
सर्वांत मोठ्या नेत्याच्या जाण्याने एकाकी झालेले नेते / कार्यकर्ते सक्षम पर्याय पक्षातच मिळाला नाही तर पर्यायाच्या आडोशाला जातात, हा अनुभव अनेकदा आलेला आहे, त्याची पुनरावृत्ती होणे पक्षासाठी धोकादायक असेल.
फडणवीस यांची हानी
अजितदादांच्या निधनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तिक हानी झाली. त्यांनी अत्यंत विश्वासार्ह मित्र तर भाजपने एक धर्मनिरपेक्ष चेहरा गमावला. महायुतीतील अंतर्गत चढाओढीत ‘बॅलन्स फॅक्टर’ म्हणून फडणवीस यांना अजित पवार यांचा उपयोग व्हायचा. दोघांची वेव्ह लेंथ अचूक जुळायची. त्यातून तीन चाकांचे सरकार चालविण्यास त्यांना मोठीच मदत होत असे. असा ‘मिस्टर डिपेंडेबल’ गेल्यानंतर आता सरकारमधील अंतर्गत सत्तासंतुलन पुढे कसे राखायचे, हा प्रश्न फडणवीस यांना सोडवावा लागेल.
उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांची जागा कोण घेईल आणि त्या व्यक्तीचे फडणवीस यांच्याशी संबंध कसे असतील, यावर पुढचे सत्तासंतुलन अवलंबून असेल. भलेमोठे बहुमत असल्याने सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नसला, तरीही कामाचा, हक्काचा माणूस गेला आहे. सरकार आहे आणि राहील. पण, सरकारमधील एक उमदे सरकार निमाले आहे.
yadu.joshi@lokmat.com