मालपूर :- शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील संतोषी माता नगरातील नवीन जलकुंभ व पाईप लाईन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे़ सुमारे ५९ लाख रुपये खर्चून नविन जलकुंभ उभारला जात असुन त्याला प्रचंड गळती प्रथम दर्शनी दिसुन आल्याने तेथील नागरिक संतप्त दिसुन येत आहेत.मालपूर येथे संतोषी माता नगरात पाणी असुन तीव्र पाणीटंचाई निर्माण होत होती. हा संपुर्ण भाग उंचावर येत असल्यामुळे येथे पाण्याचा पुरवठा पुर्ण क्षमतेने करता येत नव्हता यासाठी येथे नविन जलकुंभाची मागणी होती. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून सुमारे ५९ लाख रुपयांचा आराखडा मंजुर करुन येथे नवीन जलकुंभाची निर्मिती करण्यात आली़ मात्र सदोष कामाचा अभावामुळे या पाणी टाकिला प्रचंड गळती असल्याचे तेथील नागरिक सांगतात. नागरिकांना पाणी मिळण्याआधीच जलकुंभाला गळती लागत असेल तर यावरुन कामाचा दर्जा वर प्रश्न चिन्ह होत असुन वरिष्ठांनी याची दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.तसेच या जलकुंभापासुन नविन पाईपलाईन टाकली जात असुन ती देखील चार दिवसांपासून वाद्याच्या भोवºयात सापडल्याने येथील वाहतुकीचा मार्गच अप्रत्यक्ष बंद झाल्यामुळे येथील नागरिकांची प्रचंड तारांबळ उडतांना दिसुन येत आहे.संतोषी माता ते राणी काळज हा रस्ता १५ लाख खर्चून जिल्हा वार्षिक योजनेतून सन २०१४ साली काँक्रीटीकरण करण्यात आला होता मात्र आता याच मार्गावर जे. सी. बी. च्या साहाय्याने पाईप लाईन टाकण्यासाठी कोरल्याने संपुर्ण पैसे वाया गेल्यात जमा आहे. तसेच पाईपलाईन टाकण्याचा काही ग्रामस्थांचा विरोध असल्याने हे काम सध्या स्थितीत बंद आहे व ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यामुळे पाईपलाईन टाकण्याचे काम बंद केले असुन कोरलेली चारी परत बुजणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे यांनी यावेळी सांगितले़ मात्र यामुळे काँक्रीट रस्ताचे नुकसान झाले याचे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. रस्ता पुन्हा काँक्रीटकरण करण्याची तेथील नागरिकांना मागणी आहे.
मालपूर येथील संतोषी माता नगरातील जलकुंभाला सुरु करण्याआधीच लागली गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 11:01 PM