मोहाडी प्र. डांगरी/न्याहळोद : जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी काही भागांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. धुळे तालुक्यातील न्याहळोद आणि मोहाडी परिसरात अनेक घरांचे पत्रे उडाले, तर झाडे उन्मळून पडली. नरडाणा परिसरात जोरदार पाऊस झाला. साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यांतील काही भागांना देखील वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.
शनिवारी सायंकाळी चार वाजता अचानक जोरदार वादळी वारे वाहू लागले. धुळे शहरात पाऊस झाला नाही. परंतु, वारे जोरात वाहत होते. तालुक्यात न्याहळोद येथे माजी सरपंच कैलास पाटील यांच्या घराचे पत्रे उडाले.
मोहाडी प्र. डांगरी परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार शेतकरी बांधव शेतातील चारा, शेतीमाल, गुरे-ढोरे घरी आणण्यासाठी लगबग करीत असताना अचानक चक्रीवादळासोबतच जोरदार पाऊसही सुरू झाला. विजेचे खांब, तारा, महाकाय वृक्ष कोसळले. तसेच अनेक घरांचे पत्रेसुद्धा उडाले. या वादळमुळे १० ते १२ कुटुंबांचा संसार उघड्यावर आला. डोळ्यांसमोर राहत्या घरांचे दृश्य बघून चिमुरड्यांनी भीतीने एकच टाहो फोडला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. भर पावसात बाधित कुटुंबांचे संसारोपयोगी साहित्य जवळच्या शासकीय व्यायामशाळेत स्थलांतर करण्यासाठी गावातील तरुण तसेच ग्रामस्थ धावून आले. यात सर्वाधिक नुकसान राजेंद्र देवचंद भोई, नंदलाल भोई, अनिल भोई, विजय भोई, रवींद्र शांतीलाल भिल, महेंद्र शांतीलाल भिल, उज्जैन बाई भिल, सकूर रमजान खाटिक, रावसाहेब पंडित पाटील, नाना भाऊराव भिल, गोपाल शालिक पाटील, भिका चिंतामण भोई, अनिल मधुकर भिल, शुभम निंबा मोरे, अशोक चुडामन धनगर शिरढाणेकर भिल या नागरिकांच्या घरांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर विलास प्रभाकर चौधरी यांचा तयार कांदा पावसात पूर्ण भिजला. तसेच डांगर, टरबूज, भुईमूग, मका उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.