महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांनी धुळे शहरासह जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी विधानसभेच्या अधिवेशनात विविध विकासाचे प्रश्न मांडून रखडलेल्या कामांना चालना देण्याचे काम केले आहे. जिल्ह्याचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडल्याने त्यांनी संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान आ.कुणाल पाटील यांनी पुरवण्या मागण्यांवर चर्चा करतांना नगरविकास खात्याचे बाब क्र.२२ नुसार लक्ष वेधून घेतले. त्यात त्यांनी धुळे शहरात समाविष्ट झालेल्या दहा गावांचा तसेच उर्वरित शहराच्या विकासासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. यावेळी आ.कुणाल पाटील यांनी विधानभवनातील आपल्या भाषणात बोलतांना सांगितले की, धुळे तालुक्यातील एकूण १० ग्रामपंचायतींचा धुळे महानगरपालिकेत समावेश करण्यात आला. त्यात वलवाडी, मोराणे प्र.ल., महिंदळे, अवधान, चितोड, पिंप्री, भोकर, बाळापूर, वरखेडी, नकाणे या गावांचा समावेश आहे. ह्या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना चांगल्याप्रकारे विकास केला जात होता. मात्र मनपात समाविष्ट झाल्याने त्यांच्या विकासाला खिळ बसली. धुळे महानगरपालिकेत समावेश झाल्यापासून धुळे ग्रामीणमधील दहा गावांवर विकासाबाबत अन्याय झाला. खराब रस्ते, वीजपुरवठा, पथदिव्यांचा अभाव, गटारी, स्वच्छतेचा अभाव, पाणीटंचाई, बंद पडलेले पथदिवे आणि नवीन पथदिवे, नवीन वसाहती तसेच आदिवासी वस्तीतील विजेचे प्रश्न, अशा समस्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या दहा गावांच्या विकासासाठी शासनाला एकूण ३५० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला नगरविकास खात्याने तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी आ.कुणाल पाटील यांनी यावेळी केली.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *शहरासाठी पॅकेज द्या-
धुळे मनपातील समाविष्ट १० गावांच्या विकासासाठी शासनाला एकूण ३५० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. दरम्यान धुळे महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून शहराच्या मूलभूत विकासासाठी नवीन विशेष पॅकेजची मागणीही आ. कुणाल पाटील यांनी यावेळी केली.