उस्मानाबाद : शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुणगाण गावून झाल्यावर आता तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली का? शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काय केले, ते विचारण्याची नैतिकताच उरली नाही. त्यामुळे शिवसेना मंत्र्यांचे रस्ते अडवून दाखवाच, असे आव्हान आमदार कैलास पाटील यांनी भाजप व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. भाजपचे केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचे सिद्ध होत असल्याचे लक्षात येऊ लागल्यावर पत्रक काढून शिवसेनेवर आरोप करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. हे जनतेला समजत नाही, हा तुमचा गैरसमज आहे. शिवसेना काय करते अन् काय नाही याचा तुम्हाला चांगलाच अनुभव आहे शिवाय, हे मी तुम्हाला सांगतोय यासारखा तर योगच नसल्याचा टोला कैलास पाटील यांनी लगावला. शिवसेनेला हिशेब मागायची तुमच्यात व तुमच्या पक्षात नैतिकता उरली नाही. जेव्हा शिवसेनेने काय केले याचा हिशेब विचारता तेव्हा मागच्या ४० वर्षांच्या कारभाराचाही लेखाजोखा मांडावा. जिल्ह्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम शिवसेनेच्या फक्त दोन वर्षांच्या सत्तेत होत आहे, असा दावा करत कैलास पाटील यांनी यामुळेच विराेधकांना पोटशूळ उठल्याचे म्हटले आहे. कशावरही पत्रक काढून शिवसेनेला लक्ष्य करण्याचा तुमचा हेतू कधीच सफल होणार याची जाणीव ठेवावी. मंत्र्यांना जिल्हाबंदी करण्याचा प्रयत्न करून दाखवावा, असे आव्हानही कैलास पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना दिले.
विम्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू..
पीकविम्याच्या बाबतीत शिवसेनेने केंद्रात विमा कंपन्याचा करार रद्द करण्याची मागणी केली ती भाजप सरकारने नाकारली. भाजप सरकार व विमा कंपन्या यांचीच सेटलमेंट आहे. गेल्यावर्षी पीक विम्याच्या बाबतीत विमा कंपन्यांची मुजोरी उतरविण्यासाठी कायदेशीर मार्गाचा लढा शिवसेना देत आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीनच्या दरात घसरण होत असताना लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न केवीलवाणा असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.