‘सरकार काय झोपा काढतंय का?’; नीट पेपरफुटीवरून बच्चू कडू भडकले, दोषींना फाशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:36 IST2026-05-18T13:35:21+5:302026-05-18T13:36:45+5:30
तुळजापुरात बच्चू कडूंचे सरकारला खडेबोल; "गोरगरिबांची पोरं रक्ताचं पाणी करतात आणि ऐनवेळी पेपर फुटतो"; यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह

‘सरकार काय झोपा काढतंय का?’; नीट पेपरफुटीवरून बच्चू कडू भडकले, दोषींना फाशीची मागणी
धाराशिव : "अशा पद्धतीने जर वारंवार पेपर फुटणार असतील, तर गरिबांच्या मुलांनी परीक्षा कशासाठी द्यायच्या? सरकार काय झोपा काढतंय का?" अशा अत्यंत तिखट आणि आक्रमक शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढले असून, या प्रकरणातील दोषींना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
रविवारी आमदार बच्चू कडू हे कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देशात गाजत असलेल्या 'नीट' पेपरफुटी प्रकरणावर विचारले असता, बच्चू कडू यांचा पारा चांगलाच चढला. गाेरगरिबांची पाेरं दिवस-रात्र एक करून, रक्ताचं पाणी करून अभ्यास करतात. गरीब मायबाप आपल्या पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे उभे करतात. मात्र, ऐन परीक्षेच्या वेळी असे पेपर फुटतात. पेपर असा कसा फुटतो? यंत्रणा काय करत आहेत? जर परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेता येत नसतील, तर गरिबांच्या लेकांनी परीक्षा द्यायच्याच कशासाठी?" असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला.
दोषींना थेट फाशी द्या
"अशा पद्धतीने पेपर फुटत असेल आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सरकार म्हणून काहीच करणार नसू, तर आमच्या असण्याला काय अर्थ आहे? त्यामुळे सरकारने या प्रकरणातील मुख्य आरोपींना थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे. सरकारने जर यांना फाशी दिली नाही, तर आम्ही त्यांना मारू," असा थेट आणि खळबळजनक इशाराही त्यांनी दिला.