उस्मानाबाद : दिवसागणिक काेराेनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे रेमडेसिविरच्या मागणीतही वाढ झाली आहे. हीच संधी साधत काही मंडळी रेमडेसिविरचा काळाबाजार करीत असल्याची ओरड सर्वसामान्यांतून हाेत हाेती. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी रेमडेसिविरच्या साठेबाजीला आळा बसावा, पर्यायाने काळाबाजार राेखला जाऊन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी आठ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती ‘रेमडेसिविर’च्या विक्रीवर नजर ठेवणार आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शहरी तसेच ग्रामीण भागातही काेराेनाबाधितांच्या संख्येत भर पडू लागली आहे, तर दुसरीकडे रेमडेसिविरची चणचण भासू लागली आहे. हीच संधी साधत काहीजण रेमडेसिविरची जादा दराने विक्री करीत असल्याच्या तक्रारी हाेत आहेत. ही बाब लक्षात घेऊन रेमडेसिविरच्या खरेदी-विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगावकर यांनी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. ही समिती रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पुरवठादार, वितरक यांच्यावर देखरेख तसेच नियंत्रण ठेवण्याचे काम करील.
चाैकट...
समितीत यांचा समावेश...
राेहयाेचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे हे समितीचे अध्यक्ष असतील. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. धनंजय पाटील, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. हनुमंत वडगावे, उपविभागीय पाेलीस अधिकारी माेतीचंद राठाेड, आयएमएचे अध्यक्ष डाॅ. सचिन देशमुख, अन्न व औषध प्रशासनाचे काेडगिरे हे सदस्य, तर सहायक आयुक्त दीपक सिद हे सदस्य सचिव असतील. औषध विक्रेत्यांकडे अचानक भेट देऊन खरेदी-विक्रीची चाैकशी करणे व काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे नर्देश दिले आहेत.