उस्मानाबाद : काेरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे इयत्ता पहिली ते चौथीचे २०१९-२० चे शैक्षणिक सत्रदेखील अद्याप सुरू झोलेले नाही. यामुळे तब्बल ११ महिन्यांपासून मुले घरातच बंदिस्त झाली आहेत. त्यातील काही सुटीमुळे मजेत असली तरी अनेक जण घरात कंटाळली असून, त्यांना शाळा हवी आहे. मात्र, त्यासाठी पालकांची ना असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या संकटातून काही अंशी दिलासा मिळाल्यानंतर आणि लॉकडाऊन शासनाने शिथिलता दिल्यानंतर आधी नववी ते बारावी आणि नंतर पाचवी ते आठवीच्या सर्व शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अद्याप इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली नाही. दरम्यान, जी मुले मुळातच शिक्षणात हुशार आहेत. ती आता घरी राहून कंटाळली आहेत. त्यांना पूर्वीप्रमाणे पुन्हा शाळेत जायचे आहे. त्यामुळे आता पहिली ते चौथीच्या मुलांना शाळा सुरू होण्याची आशा आहे.
प्रतिक्रिया...
मागच्या वर्षी शाळेत जात होतो. तेव्हा मजा येत होती; पण आता खूप दिवसांपासून मी घरातच आहे. घरी राहून खूप कंटाळा आला आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होतात, त्याचीच वाट पाहत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मी शाळेत जाणार आहे.
शंकर शेळके, विद्यार्थी वर्ग ४ थी
सर्वांच्याच शाळा सुरू झाल्या आहेत. आमचीच शाळा बंद आहे. खूप दिवस झाले घरातच बसून राहावे लागत आहे. शाळा सुरू होणे गरजेचे आहे.
अनुष्का फुटाणे, विद्यार्थिनी, वर्ग २ री
आमचे सर मोबाइलवर अभ्यासक्रम पाठवितात. तो आम्ही सोडवून घेतो. शाळेत शिकविल्याप्रमाणे मोबाइलवर पाठविलेले अभ्यास समजत नाही. त्यामुळे शाळा सुरू व्हायल्या पाहिजेत.
संबोधी वाघमारे, विद्यार्थिनी, वर्ग ३ री
शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास घेत आहेत. घरी बसूनही अभ्यास होत आहे. त्यामुळे या वर्षी शाळा सुरू करू नये.
विराज मगर, विद्यार्थी, इयत्ता २ री
ऑनलाइनच शिक्षण चालू ठेवावे, लहान मुले असल्याने शाळेत कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची खबरदारी घेतली जाईल, याची खात्री नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत शासनाने घाई करू नये.
भीमराव पाटील, पालक
मुले घरी राहून कंटाळली आहेत. ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन शिक्षण महत्त्वाचे असल्याने शाळा सुरू व्हायल्या पाहिजेत. शाळा सुरू झाल्यानंतर मैदानी खेळ घेणे टाळावेत.
डॉ. मकरंद बाराते, पालक
काेरोनाचे रुग्ण संख्या कमी होत असली तरी अद्यापही कोरोनाचे संकट टळलेले नाही. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पहिली ते चौथी शाळा बंदच असणे गरजचे आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनाने रिस्क घेऊ नये.
मिलिंद कुलकर्णी, पालक