५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:14 IST2025-06-11T12:13:25+5:302025-06-11T12:14:46+5:30
Sikkim Honeymoon Couple Missing: गेल्या १३ दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे, परंतु या कपलचा कोणताही पत्ता लागलेला नाही.

५ मे रोजी लग्न, २५ ला हनिमून, २९ ला अपघात... बेपत्ता कपलचा गेल्या १३ दिवसांपासून शोध सुरू
UPCoupleMissing: हनीमूनसाठी सिक्कीमला गेलेल्या उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील एका कपलची कार सुमारे एक हजार फूट खोल दरीत कोसळली. गेल्या १३ दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे, परंतु या कपलचा कोणताही पत्ता लागलेला नाही. सध्या तीस्ता नदी आणि दरीच्या आजूबाजूच्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. दुसरीकडे या घटनेमुळे कुटुंबात खळबळ उडाली आहे. त्यांनी सरकार आणि प्रशासनाला मुलगा आणि सुनेचा शोध घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुसळधार पावसात प्रतापगड जिल्ह्यातील एका नवविवाहित कपलची कार तीस्ता नदीत पडल्याने ते बेपत्ता झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. ही घटना २९ मे रोजी सिक्कीममधील लाचेनहून लाचुंगला परतत असताना घडली. या कपलसह आणि त्यांच्या ड्रायव्हरसह एकूण नऊ जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.
कौशलेंद्र प्रताप सिंह (२९) हा प्रतापगडचा रहिवासी असून तो भाजपा नेते उम्मेद सिंह यांचा भाचा आहे. कौशलेंद्र याने ५ मे रोजी धनगड सराई चिवलाहा गावातील विजय सिंह डब्बू यांची मुलगी अंकिता सिंह (२६) हिच्याशी लग्न केलं. कौशलेंद्र यांचे काका दिनेश सिंह यांच्या मते, हे कपल २५ मे रोजी ट्रेनने सिक्कीमला रवाना झालं आणि २६ मे रोजी मंगन जिल्ह्यात पोहोचलं.
२९ मे रोजी लाचेनहून परतत असताना, मुसळधार पावसात त्यांची कार नदीत कोसळल्याची माहिती आहे. नवविवाहित कपलव्यतिरिक्त, स्थानिक ड्रायव्हरसह वाहनात इतर सात पर्यटक होते - उत्तर प्रदेशचे दोन, त्रिपुराचे दोन आणि ओडिशाचे चार. ते सर्व अजूनही बेपत्ता आहेत.
कौशलेंद्र याचे वडील शेर बहादूर, अंकिताचा भाऊ आणि काका यांच्यासह कुटुंबातील सात सदस्य सिक्कीमला पोहोचले होते. त्यांनी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून मुलगा आणि सुनेचा शोध घेण्याचे आवाहन केलं. कुटुंबाने सिक्कीम आणि राज्य सरकारकडे या कपलचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली आहे.