वडिलांचे तुकडे केल्यावर मित्राला फोन करुन मागितली मदत; बहीण-भावाचं इन्स्टाग्राम अकाऊंट लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:27 IST2026-02-26T12:25:38+5:302026-02-26T12:27:15+5:30
मानवेंद्र सिंह यांच्या हत्येचा तपास आता केवळ गुन्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. घटनेनंतर आरोपी मुलगा अक्षत आणि मुलगी कृती यांच्या हालचालींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत.

वडिलांचे तुकडे केल्यावर मित्राला फोन करुन मागितली मदत; बहीण-भावाचं इन्स्टाग्राम अकाऊंट लॉक
लखनौच्या आशियाना परिसरात झालेल्या मानवेंद्र सिंह यांच्या हत्येचा तपास आता केवळ गुन्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. घटनेनंतर आरोपी मुलगा अक्षत आणि मुलगी कृती यांच्या हालचालींवर पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत. विशेषतः दोघांचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक 'प्रायव्हेट' होणं आणि हत्येनंतर लगेचच अक्षतने आपल्या एका मित्राशी संपर्क साधणं या गोष्टी तपासात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गोळी झाडल्याची पुष्टी झाली असली तरी हत्येमागचं नेमकं कारण अद्याप तपासाधीन आहे. डिजिटल रेकॉर्ड, कॉल डिटेल्स आणि लोकेशन हिस्ट्रीच्या आधारे या घटनेचा नेमका घटनाक्रम तयार केला जात आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा किंवा तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न झाला होता का, याचाही तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
सोशल मीडियावरील हालचाली संशयास्पद
हत्येनंतरचा पहिला मोठा बदल म्हणजे अक्षत आणि कृती या दोघांचं इन्स्टाग्राम अकाऊंट्स प्रायव्हेट होणं. तपासाधिकाऱ्यांना संशय आहे की, हे पाऊल केवळ योगायोग असू शकत नाही. डिजिटल तज्ज्ञांच्या मते, गंभीर गुन्ह्यानंतर ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी किंवा आपल्या डिजिटल हालचाली लपवण्यासाठी असं केलं जातं. पोलीस आता हत्येपूर्वी आणि नंतर या दोघांच्या अकाऊंटवरून कोणाशी संवाद झाला, याचा शोध घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार कृती दोन वेगवेगळ्या नावांनी सोशल मीडियावर सक्रिय होती.
मित्राला पहिला फोन केला अन्...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांवर गोळी झाडल्यानंतर अक्षतने सर्वात आधी आपल्या एका जवळच्या मित्राशी संपर्क साधला होता. त्याने घटनेची माहिती देऊन सरेंडर होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र बहीण कृती एकटी पडेल या भीतीने त्याने आपला निर्णय बदलला आणि त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली गेली. हा प्रकार रागाच्या भरात घडला की हा एक पूर्वनियोजित कट होता, याचा पोलीस तपास करत आहेत.
पैशांवरून झाला होता वाद
१९ फेब्रुवारीला मानवेंद्र सिंह जेव्हा घरी परतले, तेव्हा त्यांनी घरात ठेवलेले ५० लाख रुपये मोजायला सुरुवात केली. ही रक्कम दारूच्या दुकानाचा परवाना रिन्यूअल ठेवली होती. रक्कम कमी भरल्याने पिता-पुत्रात कडाक्याचं भांडण झालं. आरोप आहे की, वादादरम्यान मानवेंद्र यांनी अक्षतला कानशिलात लगावली. यानंतर अक्षतने वडिलांची हत्या केली.
या तपासातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हत्येनंतर दोन्ही बहीण-भाऊ त्याच खोलीत झोपले होते जिथे मृतदेहाचे तुकडे ठेवले होते. तज्ज्ञांच्या मते, हे वर्तन सामान्य मानवी मानसिकतेच्या पलीकडचं आहे. २० आणि २१ फेब्रुवारीला कृतीने कोणतीही भीती न बाळगता आपली अकरावीची परीक्षा दिली. बाहेर सर्व काही सामान्य दाखवण्याचा प्रयत्न सुरू असताना घरात मात्र रक्ताचा सडा पडलेला होता.