लग्नानंतर २ महिन्यांतच बायको बॉयफ्रेंडसोबत पसार; नवऱ्यासह लग्न जमवणाऱ्याने मृत्यूला कवटाळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:44 IST2026-01-30T13:43:35+5:302026-01-30T13:44:21+5:30
लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली.

फोटो - ndtv.in
कर्नाटकमधून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. याच धक्क्याने पती आणि लग्न जमवणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला 'आत्महत्येस प्रवृत्त' केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
दोन महिन्यांपूर्वी सरस्वती नावाच्या महिलेचं हरीशसोबत लग्न झालं होतं. २३ जानेवारी रोजी सरस्वती मंदिरात जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. सरस्वती ही तिचा बॉयफ्रेंड शिवकुमार याच्यासोबत पळून गेली होती.
लग्नापूर्वी सरस्वती आणि शिवकुमार यांचे प्रेमसंबंध होते आणि ही बाब हरीशला माहित होती, असं सांगण्यात येत आहे. पत्नी पळून गेल्याची बातमी मिळताच ३० वर्षीय हरीश मानसिकदृष्ट्या कोलमडून पडला. त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली, ज्यामध्ये या घटनेला जबाबदार असलेल्या लोकांची नावं लिहिली आणि आपलं जीवन संपवले.
हरीशच्या मृत्यूची बातमी समजताच, ज्यांनी हे लग्न जमवलं होतं त्यांनीही आत्महत्या केली. दावणगेरेच्या पोलीस अधीक्षक (SP) उमा प्रशांत यांनी माहिती दिली की, याप्रकरणी SC/ST (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तणावातून या दोन व्यक्तींनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलीस सुसाईड नोट, कुटुंबीयांचे जबाब आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत आहेत.