Kanpur Car Accident: अटक, मेडिकल आणि लगेच जामीनही! शिवम मिश्रा एका दिवसात कसा सुटला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:27 IST2026-02-12T16:25:32+5:302026-02-12T16:27:26+5:30
Kanpur Lamborghini Accident: अपघाताचा मुख्य आरोपी आणि बड्या तंबाखू व्यापाऱ्याचा मुलगा शिवम मिश्रा याला पोलिसांनी अटक केल्यानंतर अवघ्या काही तासांतच जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Kanpur Car Accident: अटक, मेडिकल आणि लगेच जामीनही! शिवम मिश्रा एका दिवसात कसा सुटला?
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील कार अपघात प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. या अपघाताचा मुख्य आरोपी आणि बड्या तंबाखू व्यापाऱ्याचा मुलगा शिवम मिश्रा याला पोलिसांनी अटक केल्यानंतर अवघ्या काही तासांतच जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. २० हजार रुपयांच्या खाजगी जातमुचलक्यावर शिवमची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे कानपूर पोलिसांना मोठा धक्का बसला आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
अपघाताच्या चार दिवसांनंतर पोलिसांनी आज शिवम मिश्राला बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तपास पूर्ण करण्यासाठी शिवमची १४ दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, शिवमचे वकील मृत्युंजय सिंह यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला. अखेर कोर्टाने पोलिसांची रिमांडची मागणी फेटाळून लावत शिवम मिश्राला जामीन मंजूर केला.
काय आहे हे कार अपघात प्रकरण?
गेल्या रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी कानपूरच्या व्हीआयपी रोडवर एका भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात मोहम्मद तौफीक हा तरुण गंभीर जखमी झाला. घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अपघातानंतर काही बाऊन्सर शिवम मिश्राला ड्रायव्हिंग सीटवरून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेत असल्याचे दिसत होते.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह?
सुरुवातीला या प्रकरणात पोलिसांनी प्रचंड हलगर्जीपणा केल्याचा आरोप होत आहे. अपघातानंतर ग्वालटोली पोलीस ठाण्यात गुन्हा तर दाखल झाला, पण तो केवळ अज्ञात व्यक्तीविरोधात होता. मात्र, जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मीडियाने हा मुद्दा उचलून धरला, तेव्हा पोलिसांवरील दबाव वाढला. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात शिवम मिश्राचे नाव जोडले.
दिल्लीतील उपचारांचे गूढ
अपघातानंतर शिवम मिश्रा कानपूरमधून गायब झाला होता. तो दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली होती. अपघातानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगण्यात आले. मात्र, कानपूरमध्ये इतकी मोठी रुग्णालये असताना तो थेट दिल्लीला का गेला? हा केवळ अटकेपासून वाचण्याचा प्रयत्न होता का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.