भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:29 IST2026-04-03T13:28:42+5:302026-04-03T13:29:53+5:30
मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

AI फोटो
बिहारमध्येदारूबंदी असली तरी तिथे अजूनही विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. मोतिहारी जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर सात जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, यापैकी अनेक लोकांची दृष्टी गेली आहे. दोन रुग्णांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
पोलीस अधीक्षक (एसपी) स्वर्ण प्रभात यांनी चार जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं की, सात जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एसपींनी माहिती दिली की, या प्रकरणात चौकीदार भरत राय आणि मुख्य आरोपी नागा राय याला त्याच्या कुटुंबातील महिलांसह अटक करण्यात आली आहे. तुर्कौलिया प्रभारी उमाशंकर मांझी यांच्यावरही कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मृतांमध्ये स्थानिक तरुण चंदूचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाईघाईत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे, रुग्णालयात दाखल असलेला लोहा ठाकूर आणि त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं की, त्याने मंगळवारी रात्री स्पिरीट मिश्रित दारू प्यायली होती. तेव्हापासून त्याची प्रकृती बिघडली असून त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली आहे.
चंदूच्या पुतण्याने सांगितलं की, जेव्हापासून दारूबंदी लागू झाली आहे, तेव्हापासून परिसरात शेकडो ठिकाणी अवैध दारूचा व्यवसाय सुरू आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही विषारी दारूची लक्षणं असल्याचे सांगत रुग्णांच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वीही मोतिहारीमध्ये विषारी दारू प्यायल्याने ४५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही अशा प्रकारची घटना पुन्हा घडणं प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतं.
यापूर्वी याच वर्षी फेब्रुवारीमध्ये रोहतासमध्ये वेगवेगळ्या गावातील एकूण पाच जणांच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली होती. हे लोक एका लग्नकार्यातून परतले होते असं सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि एकामागून एक सर्वांचा मृत्यू झाला. स्थानिक लोकांनी या मृत्यूंमागे विषारी दारू, किडनी निकामी होणं किंवा कुत्रा चावणं अशी वेगवेगळी कारणं सांगितली होती. मात्र रोहतास पोलीस प्रशासनाने याप्रकरणी अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नव्हती.