मित्राच्या नावाने २ कोटींचा विमा काढला, नंतर त्याचाच 'गेम' केला; पैशांसाठी रचला भयंकर कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:11 IST2026-02-18T14:09:51+5:302026-02-18T14:11:11+5:30
एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

मित्राच्या नावाने २ कोटींचा विमा काढला, नंतर त्याचाच 'गेम' केला; पैशांसाठी रचला भयंकर कट
तेलंगणाच्या भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बर्गमपाड पोलिसांनी मित्राच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली दोन तरुणांना अटक केली आहे. तब्बल दोन कोटी रुपयांची विमा रक्कम हडपण्यासाठी या दोघांनी हे भयानक कृत्य केल्याचा गंभीर आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक खासगी बँकेचा कर्मचारी आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ फेब्रुवारीच्या रात्री बर्गमपाड मंडळातील मोथे गावाजवळ यशवंत हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं. त्याला तातडीने भद्राचलम येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खम्मम येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
यशवंतची मावशी मुलिसेट्टु रामा यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. हा केवळ अपघात नसून सुनियोजित हल्ला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. तपासादरम्यान गन्नावरम येथील कट्टा साई दीपक आणि त्याचा मित्र भद्राचलम येथील कोंडा भानु प्रकाश यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला.
मंगळवारी संध्याकाळी सरपाका येथे कारमधून जात असताना या दोघांना अटक करण्यात आली. यातील भानु प्रकाश हा एका खासगी बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत आहे. पोलीस तपासात उघड झालं की, नोव्हेंबर २०२५ मध्ये आरोपींनी यशवंतच्या नावाने एक विमा पॉलिसी काढली होती. यामध्ये साई दीपकला 'नॉमिनी' करण्यात आलं होतं. यासाठी साई दीपकने स्वतःला यशवंतचा नातेवाईक असल्याचं भासवलं होतं.
पोलिसांच्या आरोपानुसार, १४ फेब्रुवारीच्या रात्री दोन्ही आरोपींनी यशवंतला मोथे गावाजवळ नेलं. तिथे त्याला भरपूर दारू पाजली. यशवंत जेव्हा आपल्या स्कूटरवर बसण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा आरोपींनी मागून लोहेच्या रॉडने त्याच्या डोक्यावर वार केले. ही घटना अपघात वाटावी यासाठी आरोपींनी यशवंतची बाईक रस्त्याच्या कडेला फेकून दिली आणि त्याला मरणासन्न अवस्थेत सोडून तिथून पळ काढला.
सब-इन्स्पेक्टर मेडा प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. यशवंतचा मृत्यू झाल्यास विम्याची मोठी रक्कम आपल्याला मिळेल या लालसेपोटी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून पोलीस विमा कागदपत्रांची अधिक तपासणी करत आहेत.