दिवसा रेकी, रात्री डल्ला! वडिलांवर होता कर्जाचा मोठा डोंगर; लेकाने केल्या २४ हून अधिक चोऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:26 IST2026-01-18T12:25:22+5:302026-01-18T12:26:26+5:30
वडिलांवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी एका तरुणाने २४ हून अधिक चोऱ्या केल्या.

फोटो - tv9hindi
राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यात चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. वडिलांवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी एका तरुणाने २४ हून अधिक चोऱ्या केल्या. अखेर निहालगंज पोलिसांनी या सराईत चोरालाअटक केली आहे. निहालगंज पोलिसांनी मोठी कारवाई करत या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी चोरीच्या १२ घटनांचा उलगडा केला असून, चोराकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे लागला छडा
पोलीस अधीक्षक (SP) विकास सांगवान यांनी सांगितलं की, २६ डिसेंबर रोजी मानसरोवर कॉलनीतील श्वेता नावाच्या महिलेने तक्रार दिली होती. त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड आणि दागिने लंपास केले होते. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला.
ट्रक चालक बनून पोलिसांना देत होता चकवा
मिळालेल्या माहितीनुसार, 'अरमार' नावाचा हा मुख्य आरोपी चोऱ्या करून आपल्या साथीदारांना सोडून दुसऱ्या ठिकाणी पळून जात असे. पकडले जाऊ नये म्हणून तो उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात ट्रक चालवण्याचं काम करत होता. पोलीस सीडीआर (CDR) आणि लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेत होते, मात्र तो वारंवार आपली जागा बदलत होता.
गावी येताच पोलिसांच्या जाळ्यात
हा चोर आपल्या गावी आला होता आणि पुन्हा बाहेर जाण्याच्या तयारीत होता. याच दरम्यान, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 'सुआ के बाग' परिसरातून त्याला अटक केली. आरोपी सहा महिन्यांपूर्वीच मध्य प्रदेशातील तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. या टोळीतील अन्य दोन साथीदारांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. हे चोरटे दिवसा दुचाकीवरून शहरात रेकी करायचे. ज्या घरांना कुलूप असायचे, अशा घरांना ते रात्री टार्गेट करत असत. आरोपीने चौकशीदरम्यान वडिलांवर कर्जाचं मोठं ओझं होतं, ते फेडण्यासाठीच त्याने चोरीचा मार्ग पत्करला असं म्हटलं आहे.