‘ओला दुष्काळ’ कधी? मराठवाड्यातील शेतकरी संकटात, ५ हजार गावांतील पिकांचा चिखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 12:06 IST2025-09-23T12:05:01+5:302025-09-23T12:06:26+5:30

मराठवाड्यावर आभाळ फाटले, ७५ मंडळात अतिवृष्टीने कहर, २,३०० कोटींच्या मदतीचा अहवाल सरकारला सादर

When will the 'wet drought' occur? Farmers in Marathwada are in trouble, crops in 5,000 villages are in mud | ‘ओला दुष्काळ’ कधी? मराठवाड्यातील शेतकरी संकटात, ५ हजार गावांतील पिकांचा चिखल

‘ओला दुष्काळ’ कधी? मराठवाड्यातील शेतकरी संकटात, ५ हजार गावांतील पिकांचा चिखल

छत्रपती संभाजीनगर : ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत दीडपट जास्तीचा पाऊस झाल्यामुळे जोमात आलेले खरीप हंगामातील पीक आडवे झाले. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने आजपर्यंत ५ हजार ३२० गावांतील पिकांचा चिखल केला. मराठवाड्यावर आभाळ फाटले आहे. 

२२ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९, जालन्यातील १०, बीडमधील २९, लातूरमधील ३, धाराशिवमधील २१ तर नांदेड व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. १३ मंडळांत १०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला. पैठण तालुक्यातील आपेगाव मंडळात १६६ मि.मी. पावसाची नोंद झाली. सप्टेंबरमध्ये एकाच दिवसात ७५ मंडळांत अतिवृष्टी होण्याचा यंदा विक्रम झाला आहे.

तीन महिन्यांतील नुकसानीच्या तुलनेत विभागीय प्रशासनाने शासनाकडे २,३०० कोटींची नुकसान भरपाई मिळावी, असा अहवाल पाठविला आहे. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यातील ५० टक्के म्हणजेच ७०० कोटींच्या नुकसान भरपाईला मंजुरी मिळाली. मात्र तुलनेत नुकसानीचे आकडे मोठे आहेत.

गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला
मराठवाड्यात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात ६७९ मि.मी. वार्षिक सरासरीच्या तुलनेत २२ सप्टेंबरपर्यंत ७४६ मि.मी. म्हणजे ११७ टक्के पाऊस झाला होता. यंदा ७८९ मि.मी. पाऊस झाला असून १२४ टक्के ते प्रमाण आहे.

२२ गावांचा संपर्क तुटला, ७० जणांचे स्थलांतर
गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे मराठवाड्यातील धाराशिव, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील २२ गावांचा संपर्क तुटला. पुरामुळे ७० जणांना सुरक्षित ठिकाणी हलविले. महसूल, आर्मी, न.प. व अग्निशमन विभागाने मदतकार्य केले.

नऊ दिवसांत २६६ मंडळांतील ५,३२० गावांत नुकसान
मराठवाड्यात जून, जुलै, ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत खरीप हंगामातील पिकांचे सर्वाधिक नुकसान १२ ते २२ सप्टेंबर या कालावधीत झाले. नऊ दिवसांतील अतिवृष्टीने सुमारे ५,३२० गावांतील खरीप हंगामातील पिके संपविली. २६६ मंडळांत अतिवृष्टीने थैमान घातले.

तारीख........अतिवृष्टी...
१३ सप्टें.........१९
१४ सप्टें..........५३
१५ सप्टें..........३२
१६ सप्टें...........४१
१७ सप्टें...........१५
१८ सप्टें...........०५
१९ सप्टें...........०७
२० सप्टें...........१०
२१ सप्टें...........०९
२२ सप्टें.........७५
एकूण.............२६६

Web Title: When will the 'wet drought' occur? Farmers in Marathwada are in trouble, crops in 5,000 villages are in mud