अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका; ११ हजार हेक्टरवर नुकसान, संथ पंचनामे, मदत कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 13:04 IST2025-06-03T13:03:01+5:302025-06-03T13:04:02+5:30

अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका;  वीज पडून २५ जणांचा मृत्यू; ४०० जनावरेही दगावली

Unseasonal rains hit Marathwada hard; Damage to 11 thousand hectares, slow Panchnama, when will help come? | अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका; ११ हजार हेक्टरवर नुकसान, संथ पंचनामे, मदत कधी?

अवकाळीचा मराठवाड्याला जबर फटका; ११ हजार हेक्टरवर नुकसान, संथ पंचनामे, मदत कधी?

छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात सुमारे पंचवीस दिवसांच्या कालावधीत मराठवाड्याला अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका बसला. अवकाळी पावसाने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये बीड जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. एकट्या बीड जिल्ह्यात साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. वीज पडून आठही जिल्ह्यांत मिळून २५ असून, २९ जण जखमी झाले आहेत. तर सुमारे ४०० जनावरे दगावली आहेत. हळद, भुईमूग, ज्वारी, कांदा यासह केळी, आंबा या पिकांना मोठा फटका बसला आहे.

बीड आणि परभणी जिल्ह्यात काही घरांची पूर्णतः पडझड झाली असून, ८४ घरे अंशतः कोसळली आहेत. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. अवकाळी पावसाचा मराठवाड्यातील सुमारे ६०० गावांना फटका बसला असून, सात हजारांपेक्षा अधिक शेतकरी बाधित झाल्याची नोंद आहे.नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात हळद पिकाला मोठा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात बागायती क्षेत्र असलेल्या ४३५४.७५ हेक्टर व फळ पिकांचे १६७.९२ हेक्टर, असे एकूण ४५२२. ६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

नांदेड : ४८१ हेक्टरचे नुकसान
सुमारे १६ दिवस चाललेल्या या मान्सूनपूर्व पावसाने ७९२ शेतकऱ्यांची ४८१.६२ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. उन्हाळी हंगामातील तीळ, भुईमूग, ज्वारी, हळद, केळी, कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, बागायती व भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. तसेच नदी, नाल्यांना पूर आल्याने लगतची शेती खरडून नुकसान झाले आहे.  विजेच्या कडकडाटामुळे जिल्ह्यात दहा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. नायगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील दोन शेतकरी वीज पडल्याने जखमी झाले असून, सांगवी येथील चंद्रकांत महागावे या युवकाचा वीज पडून मृत्यू झाला आहे. विशेषतः नायगाव, मुखेड, मुदखेड, कंधार, उमरी, भोकर, धर्माबाद, देगलूर, किनवट, बिलोली, हदगाव, अर्धापूर तालुक्यांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने पिकांचे अधिक नुकसान झाले आहे. नायगाव तालुक्यात सुमारे ७०० शेतकऱ्यांचे ४१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या तालुक्यात १५६ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे.

बीड : साडेचार हजार हेक्टरला फटका
फळपिकांचे मोठे नुकसान; १४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
२२८.९ मिमी पाऊस झाला.
अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यापासून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.
१४ शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे.
शेतीचे नुकसान : बागायती ४३५४.७५ हेक्टर व फळपिके १६७.९२ हेक्टर, असे एकूण ४५२२. ६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लातूर : फळपिकांचे मोठे नुकसान
जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या नाही
२३९.४ मिमी पाऊस झाला.
आंबा, पपई, खरबूज, चिकू, पेरूसह टोमॅटो, सिमला मिरची, शेवग्याचे नुकसान.
जिल्ह्यात २ हजार ३८७. ०२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान.
महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू झाले आहेत.
शेतकऱ्याच्या आत्महत्येची घटना नाही.

हिंगोली : मे महिन्यात १३६.८ मिलिमीटर
- १२९.९० हेक्टरकेळी, पपई, हळद या पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल आणि कृषी विभागाकडून जिल्ह्यात पंचनामे सुरू आहेत.
- मे महिन्यात ४ शेतकरी आत्महत्या झाल्या.

परभणी : १३१ मिलिमीटर पाऊस झाला.
पिकांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे पंचनामे नाहीत.
मे महिन्यात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

सर्व आशा, अपेक्षांचा स्वप्नभंग
रात्रंदिवस मेहनत करून टोमॅटोला चांगली बाजारपेठ मिळेल, या आशेने अडीच एकरांत टोमॅटोची यशस्वी लागवड केली. परंतु अवकाळी पावसाने शेतात पाणीच पाणी झाल्याने डोळ्यांदेखत टोमॅटोचा अक्षरशः चिखल झाला. त्यामुळे आमच्या सर्व आशा, अपेक्षांचा स्वप्नभंग झाला.
-कृष्णा दादासाहेब थोरवे, शेतकरी, कुंडी वाहिरा, ता. आष्टी

शेतमालाचे पैसे नाही तर चिखलच हाती
आमची पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेली. आमचे सर्व रस्ते बंद झालेत, मजुरांचे पैसे देणे बाकी आहे. सध्या पेरणीचे दिवस आलेत. खते, बी-बियाणे कुठून आणायचे? मुलांची फीस आहे. कांद्याचे पैसे हातात येण्याऐवजी कांद्याचा चिखलच आमच्या हाती आला आहे. आम्ही कसं करायचं?
- महेश दरेकर, शेतकरी, शिदेवाडी, ता. आष्टी

वादळीवाऱ्याने प्रचंड नुकसान
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस व वादळी वारे वाहिल्याने केळीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दोन एकरांत केळीची लागवड केली होती. जवळपास ३ ते ४ लाख रुपयांचे वादळात नुकसान झाले आहे.
-बालाजी जाधव, शेतकरी, म्हतारगाव, ता. वसमत

कांद्याची नासाडी झाली
यावर्षी एका एकरमध्ये कांदा लागवड केली होती. लागवडीसाठी ३५ हजार रुपये खर्च झाला. ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने थैमान घातले. सतत पाऊस होत असल्याने कांद्याला जमिनीतच सड लागली. ७० टक्के कांद्याची नासाडी झाली.
- इमरान खान अजमत खान पठाण, जवळा पांचाळ, ता. कळमनुरी

मदतीचा हात द्यावा
सततचा पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो मदतीचा हात द्यावा. कारण, पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा नाही. त्यातच अवकाळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
-योगेश पवार, चाभरा, ता. हदगाव.

Web Title: Unseasonal rains hit Marathwada hard; Damage to 11 thousand hectares, slow Panchnama, when will help come?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.