सुसाट कारच्या धडकेने हिरावले गरीब कुटुंबातील तीन तरुण; केटरिंग, भाजी विकून घ्यायचे शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 18:29 IST2026-02-14T18:29:20+5:302026-02-14T18:29:31+5:30
सुसाट कार ३० फूट हवेत उडून तरुणांच्या अंगावर पडली; दोन मित्रांचा अंत.

सुसाट कारच्या धडकेने हिरावले गरीब कुटुंबातील तीन तरुण; केटरिंग, भाजी विकून घ्यायचे शिक्षण
छत्रपती संभाजीनगर: वाहनांच्या अनियंत्रित वेगाने शहरात एकाच वेळी तीन मध्यमवर्गीय कुटुंबांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. हर्सूल आणि न्यू पहाडसिंगपुरा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत अनिकेत निंबाळकर (२३), मनोज भिलंग (२२) आणि १७ वर्षीय उबेद पठाण या तीन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे तिघेही तरुण आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी शिक्षण सांभाळून काम करत होते.
केटरिंगचे काम आटोपून येताना काळाने गाठले
पहिल्या घटनेत, विद्यापीठात शिक्षण घेणारा अनिकेत निंबाळकर आणि त्याचा मित्र मनोज भिलंग हे केटरिंगचे काम आटोपून मध्यरात्री पायी घराकडे निघाले होते. यावेळी मयूर पार्क येथील मंगेश कोलते याच्या कारचा वेग इतका प्रचंड होता की, कार दुभाजकाला धडकून चक्क ३० फूट हवेत उडाली आणि थेट पायी जाणाऱ्या तरुणांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात अनिकेतचा जागीच मृत्यू झाला, तर मनोजने सलग सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शुक्रवारी खाजगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. दोघेही केटरिंग काम करून शिक्षण घेत असत. या दोघांच्या निधनाने विद्यापीठ परिसरात शोककळा पसरली आहे.
भाजी विकून शिकणारा उबेद रक्ताच्या थारोळ्यात
दुसरी घटना हर्सूल गावातच घडली. १७ वर्षांचा उबेद पठाण हा भाजी विकून आपल्या आई-वडिलांना मदत करायचा. गुरुवारी मध्यरात्री काम संपवून घरी जात असताना एका अज्ञात सुसाट वाहनाने त्याला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, उबेद त्या वाहनाखाली अडकून लांबपर्यंत फरफटत गेला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घरातील कमावता मुलगा गेल्याने पठाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेतकरी कुटुंबातील मुले आणि अपूर्ण स्वप्ने
हे तिन्ही तरुण शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबातील होते. अनिकेत MSW करत होता, मनोज पदव्युत्तर शिक्षण घेत होता, तर उबेद शाळेत शिकत होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने हे तरुण सुटीच्या दिवशी आणि रात्री-अपरात्री काम करायचे. मात्र, कोणाच्या तरी बेजबाबदार वेगामुळे या तिन्ही लेकरांचा आधार कायमचा हिरावला गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे, मात्र गेलेला जीव परत येणार नसल्याने हळहळ व्यक्त होत आहे.