सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण: उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; निकाल राखून ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 19:32 IST2026-03-14T19:32:03+5:302026-03-14T19:32:51+5:30
प्रकाश आंबेडकर यांची खंडपीठात मोठी मागणी; सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गृहमंत्र्यांना बोलावण्याची विनंती

सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण: उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण; निकाल राखून ठेवला
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल मूळ याचिकेत दुरुस्ती अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर न्या. संदीपकुमार मोरे आणि न्या. आबासाहेब शिंदे यांनी हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवले.
कायद्यात स्पष्टता नाही
या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे आणि संबंधित पाेलिसांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सोमनाथ यांच्या आई विजया सूर्यवंशी यांनी याचिका दाखल केलेली आहे. त्यांची बाजू ॲड. प्रकाश आंबेडकर मांडत आहेत. या प्रकरणात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या जबाबानंतर त्यावर पुढील कार्यवाही कुणी व कशी करावी, याबाबत कायद्यात स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत खुलासा करण्याच्या संदर्भात गृहमंत्र्यांना न्यायालयात बोलाविण्याची विनंती त्यांंनी केली होती. मात्र, मूळ याचिकेत ही मागणी नसल्याने दुरुस्ती करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देण्यात आला होता. मूळ याचिकेत दुरुस्ती अर्ज सादर केल्यानंतर शुक्रवारी त्यावर सुनावणी झाली. ॲड. आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी गृहमंत्र्यांना बोलावण्याची विनंती केली. त्यानंतर सरकारतर्फे अमरजितसिंह गिरासे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर दुरुस्ती अर्जावरील निकाल खंडपीठाने राखून ठेवला आहे. मूळ याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काम पाहिले. त्यांना ॲड मिलिंद संदानशिव यांनी सहकार्य केले.