‘बाप्पा मोरया’च्या गजरात सिध्देश्वर नगरी दुमदुमली
By Admin | Updated: September 10, 2014 00:48 IST2014-09-10T00:37:46+5:302014-09-10T00:48:04+5:30
लातूर : गणपती बाप्पा मोरयाऽऽ गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर या़़़ अशा घोषणांनी श्री गणरायाला गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात सोमवारी निरोप दिला़ ढोल,

‘बाप्पा मोरया’च्या गजरात सिध्देश्वर नगरी दुमदुमली
लातूर : गणपती बाप्पा मोरयाऽऽ गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर या़़़ अशा घोषणांनी श्री गणरायाला गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात सोमवारी निरोप दिला़ ढोल, ताशा, लेझीम पथक आणि विविध देखाव्यांचे सादरीकरण करत गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला़ गणेश मंडळांच्या बहुतांश मिरवणुकीत ‘लय भारी’ चित्रपटातील माऊली माऊली या गाण्यावर वारकरी नृत्य सादर झााले़ यंदाची श्रींची मिरवणूक माऊली माऊली गाण्याने गाजविली़
लातूर शहराच्या चारी बाजूला श्री गणरायाचे विसर्जन करण्याची सोय करण्यात आली होती़ शिवाजी चौक व परिसरातील गणेश मंडळांसाठी बांधकाम भवन येथील विहिरीत विसर्जन करण्यात आले़ तर शिवाजी चौकापासून एमआयडीसी भागासाठी रिंग रोडवरील विहिरीत विसर्जनाची सोय होती़ गावभागातील गणपती मंडळांसाठी सिद्धेश्वर देवस्थानच्या तीर्थकुंडात तर अंबाजोगाई रोड आणि परिसरातील गणेश मंडळांसाठी रेणापूर नाका भागात असलेल्या विहिरीत श्रींचे विसर्जन करण्यात आले़ मिनी मार्केट व मोती नगर परिसरातील गणेश मंडळांसाठी कव्हा तलावात विसर्जन करण्यात आले़ त्यामुळे गावभागात गणेश भक्तांची होणारी गर्दी विभागली गेली़ आधुनिक वाद्याऐवजी पारंपरिक वाद्यावर यंदाच्या मिरवणूका निघाल्या होत्या़ डीजे व डॉल्बीचे प्रमाण तसे कमीच होते़ गुलालाचाही वापर कमी होता.
मिरवणूकीत वाद्य वाजविण्यासाठी पोलिसांनी रात्री १२ च्या नंतर विरोध केला होता़ त्यामुळे गणेश भक्तांत नाराजी पसरली़ शेवटची विसर्जन मिरवणूकीची आरती जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे़ मात्र ही मिरवणूक सुभाषचौकात रात्री १२ वाजता पोहचली परंतु विसर्जनाला बराच अवधी लागला़ त्यामुळे पोलिस अधिक्षकांऐवजी मंडळ पदाधिकाऱ्यांचे हस्ते आरती करण्यात आली़
देखाव्यांच्या सादरीकरणाबरोबर लक्षवेधी आणि बोलकी बॅनरबाजीही काही मंडळांनी केली होती़ ‘काका मला वाचवा’ हे बॅनर कुणाच्याही नजरेतून सुटत नव्हते़ प्रत्येकजण हे बॅनर वाचूनच पुढे जात होते़ या बॅनरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांचे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला दिलीपराव देशमुख आणि राज्यमंत्री अमित देशमुख यांचे छायाचित्र होते़ मजकुर मात्र तीनच शब्दांचा. काका मला वाचवा...!
दक्ष नागरिक संघाच्या वतीने श्रींच्या मिरवणुकीत महाविद्यालयातील मुला-मुलींंनी भक्तांची काळजी घेतली. दयानंद महाविद्यालय आणि राजर्षी शाहू महाविद्यालयातील ८०० विद्यार्थ्यांनी स्यंसेवक म्हणून पोलिसांना सहकार्य केले. त्यामुळे बंदोबस्ताचा पोलिसांवरचा ताण कमी झाला.
मनपावर नाराजी़़़
४ तीर्थकुंडात पाणी पुर्णपणे न भरल्यामुळे गणेश भक्तांची गैरसोय झाली़ श्री मूर्ती या पाण्यात पुर्णपणे बुडतील अशी सोय नव्हती़ तथापि, महानगरपालिकेने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली़
गणेश भक्तांनी फुलांची उधळण करुन आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला़ पहिला मानाचा गणपती भारत रत्नदिप आझाद गणेश मंडळाची मिरवणूक सुभाष चौकात ७ वाजता पोहचली़ त्यानंतर तीर्थकुंडाकडे ही मिरवणूक विसर्जनासाठी मार्गस्थ झाली. विविध देखावे तसेच कलापथकाचे सादरीकरणातून मनोरंजनाबरोबर प्रबोधन करण्यावर मंडळांचा भर होता़ महानगर पालिकेच्या कचरा व्यवस्थापनावरही अनेक मंडळांनी देखाव्याच्या सादरीकरणातून प्रहार केला़ रस्त्यावर जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढिगारे, त्यातून पसरणारी रोगराई आदी बाबत मंडळांनी प्रकाश टाकला़ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नृत्य, भजन, कलापथक, महापुरुषांची प्रतीरुपे घेवून श्री गणरायांची विसर्जन मिरवणूका पार पडल्या़ शेवटची औसा हनुमान गणेश मंडळाची मिरवणूक रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सुभाष चौकात पोहचली़ तेथे आरती झाल्यानंतर विसर्जनासाठी सिद्धेश्वर देवस्थानच्या तीर्थकुंडाकडे रवाना झाली़ विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता़ १२ वाजता डॉल्बी व डीजेचा आवाज बंद करण्यात आला़ काही मिरवणूका पारंपारिक वाद्यविनाही विसर्जीत करण्यात आल्या़