सातारा- देवळाईत नागरिकांचा ‘जागते रहो’ चा नारा

By Admin | Updated: December 23, 2015 00:10 IST2015-12-22T23:44:06+5:302015-12-23T00:10:23+5:30

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरात सर्वत्र अंधार आणि विरळ वसाहती असल्याने चोऱ्यामाऱ्या वाढल्या असून, महिनाभरात किमान ६ घरफोड्या झाल्या आहेत.

Satara- The slogan 'Awakening of the people' in Devlai | सातारा- देवळाईत नागरिकांचा ‘जागते रहो’ चा नारा

सातारा- देवळाईत नागरिकांचा ‘जागते रहो’ चा नारा

औरंगाबाद : सातारा- देवळाई परिसरात सर्वत्र अंधार आणि विरळ वसाहती असल्याने चोऱ्यामाऱ्या वाढल्या असून, महिनाभरात किमान ६ घरफोड्या झाल्या आहेत. एकाच वसाहतीत अनेकदा चोऱ्यांचे प्रकारही घडूनही पोलिसांना तपासात साफ अपयश आले आहे. अखेर साईनाथनगरातील नागरिकांनी स्वत:च रात्रीची गस्त सुरू केली
आहे.
मनपाला कळवूनही परिसरात दिवाळीला दिवे लागले नाहीत. दोन दिवसांपूर्वीच सातारा यात्रा संपली तरीदेखील दिवे लावण्यात आलेले नसल्याची खंत नागरिकांंतून व्यक्त होत आहे. रात्री अंधार असल्याने घर गाठताना नागरिकांना धाकधूक वाटत आहे.
परिसरात अधूनमधूनच पोलिसांची गस्त दिसते, असे सांगण्यात येते. तरी विरळ वस्ती, अंधार आणि त्यातही खाजगी सुरक्षारक्षकांचाही अभाव आहे. काही अपार्टमेंटमध्ये वॉचमन ठेवले जात आहेत.
तरीही चोऱ्या थांबत नसल्याने आठ ते दहा जणांनी साईनाथनगरात गटागटाने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचीही परिसरात गस्त दिसावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
सजग नागरिकांचा उपक्रम
स्वप्नील शिरसाट, विलास काळे, अतुल चौधरी, ऋषिकेश वारुणे, प्रल्हाद बेळगे, रवी जाधव, अजय काळे, प्रभाकर बाबा भुसारे, आकाश शर्मा आदींसह नागरिकांचा समावेश आहे.
सजगता महत्त्वाची
पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती म्हणाले की, सातारा परिसरात आमच्या कर्मचाऱ्यांची गस्त सुरूच असते, एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी गस्ती पथकांसाठी भेट रजिस्टरही आहे. त्यात गस्ती पथकांकडून नोंद केली जाते. काही ठिकाणी चोऱ्या झाल्या असून, त्यांचा तपास सुरू आहे. बीट अंमलदार व कर्मचारी त्या प्रकरणी तपास करीत आहेत. रहिवाशांंनीही आपल्या कॉलनीत संशयित व्यक्ती फिरताना आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. कॉलनीतील पहारेकऱ्यांची माहिती पोलीस ठाण्यातही
नोंदवावी.

Web Title: Satara- The slogan 'Awakening of the people' in Devlai