औरंगाबाद - जिल्ह्यात पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू झाले. विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यात एस. टी. बस ची सुविधा महत्वाची ठरते. मात्र, आज घडीला जिल्ह्यात केवळ ३२ बसेस विद्यार्थ्यांसाठी धावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट होत असून खाजगी वाहनांचा आधार घेत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे.
मानव विकास मिशनच्या बसेसची सुविधा जिल्ह्यात लागू नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना केवळ नियमित बसेसनेच शहरात किंवा जवळच्या शाळेचा प्रवास करुन शाळेत ये जा करावी लागते. तर शहरात स्मार्ट शहर बसच्या माध्यमातून प्रवास करावा लागतो. अद्याप खाजगी स्कूल बस सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांना पालकांना ने आण करावी लागते. किंवा रिक्षांची मदत घ्यावी लागत आहे. त्यामुळे पालकांसह शिक्षकांतूनही स्कूल बस सुरू करण्याची मागणी होत आहे. शहरात शिक्षण घेण्यासाठी विविध भागातून विद्यार्थी येतात. यातील बहुतांश विद्यार्थी हे शहर बसने प्रवास करतात. या विद्यार्थ्यांनी सवलत योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे. विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी सिडको बसस्थानक, औरंगपुरा आणि रेल्वे स्टेशन येथे पास केंद्र सुरू केले आहे.
--
वेळेवर बसेस येईना
जिल्हाभरात अनेक मार्गांवर एसटी बसेस वेळेवर धावत नसल्याची परिस्थिती आहे. पुरेसे भारमान नसल्याने अनेक गावांतील बसेसची संख्या कमी करण्यात आली. परिणामी विद्यार्थ्यांना पायपीट करुन अथवा खाजगी वाहतूक, सायकल यांचा आधार घेऊन शाळा गाठावी लागत आहे.
--
नऊ तालुक्यांत ३२ फेऱ्या सुरू
प्रत्येक तालुक्यात चार ते पाच बसेसच्या फेऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केल्या आहेत. त्यात शाळांच्या मागणीनुसार पुन्हा बसेस वाढवण्यात येतील असे विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी सांगितले. मात्र, विद्यार्थ्यांच्या तुलनेत या बसची संख्या अपुरी असून यात वाढ करण्याची मागणी पालकांतून होत आहे.
---
जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी बसेस धावत आहे. पासची सुविधा दिली जात आहे. शाळांच्या मागणीनुसार पासही उपलब्ध करुन दिले जात आहेत. शाळेच्या वेळेनुसार बसेसचे नियोजन करत आहोत.
-अमोल अहिरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एस. टी. महामंडळ