‘गंगापूर’ आणि ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघांत पेच

By Admin | Updated: August 27, 2014 00:14 IST2014-08-27T00:09:12+5:302014-08-27T00:14:39+5:30

औरंगाबाद : दोन्ही मतदारसंघांत तिकीट देताना दोन्ही पक्षांपुढे पेच निर्माण होणार आहे.

Patches in 'Gangapur' and 'Central' Assembly Constituencies | ‘गंगापूर’ आणि ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघांत पेच

‘गंगापूर’ आणि ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघांत पेच

औरंगाबाद : जिल्ह्यातील विधानसभेच्या नऊ मतदारसंघांपैकी शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने ‘औरंगाबाद मध्य’ आणि ‘गंगापूर’ हे दोनच मतदारसंघ डोकेदुखीचे ठरत असून, या दोन्ही मतदारसंघांत तिकीट देताना दोन्ही पक्षांपुढे पेच निर्माण होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
औरंगाबाद शहरातील पश्चिम, पूर्व, तसेच शहराचा काही भाग समाविष्ट असलेल्या फुलंब्री मतदारसंघात विद्यमान आमदारांची त्या त्या पक्षाकडून तिकिटे निश्चित मानली जात आहेत. तशी त्या आमदारांची तयारीही सुरू आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात मात्र अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासमोर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी आव्हान उभे केले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तिकिटासाठी जोरदार टक्कर असल्याचे दिसून येते. सोशल मीडिया तसेच व्हॉट्सअप आदी माध्यमांतूनही या दोघांच्या समर्थकांनी आधीच एकमेकांवर शरसंधान साधले आहे. मोफत पाणीवाटप आणि व्यवसायाच्या निमित्ताने जमलेली कार्यकर्त्यांची फळी या बळावर तनवाणी हे निवडणूक लढवू पाहत आहेत. पूर्वाश्रमीचे घनिष्ठ मित्र असलेल्या शिवसेनेच्या या दोन्ही नेत्यांमध्ये आता तेवढा सलोखा राहिला नाही. आ. जैस्वाल यांना यावेळी विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबरोबरच स्वकीयांचाही त्रास सहन करत पुढे जावे लागत आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे आणि २००९ मध्ये आ. जैस्वाल यांनी ज्यांना पराभूत केले ते शिवसेनेचे उमेदवार विकास जैनही आ. जैस्वाल यांच्या बरोबर नसल्याचे चित्र आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीत ‘मध्य’ मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला सुमारे दोन हजार मतांची आघाडी मिळाली. ही आघाडी मिळविण्यासाठी कारणीभूत ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांचे आ. जैस्वाल यांच्या समोर आव्हान राहण्याची चिन्हे आहेत. मात्र, विनोद पाटील यांच्या समोरही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याचे आव्हान आहे.
२००९ चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अब्दुल कदीर मौलाना हेदेखील एक तगडे इच्छुक आहेत. शिवाय परभणी येथील रहिवासी राज्यमंत्री फौजिया खान यांचेही नाव वेगाने चर्चेत आल्याने पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. ‘मध्य’ मतदारसंघातून मुस्लिम उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी जोर धरू लागल्यानेही पक्षापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकंदरीत उमेदवारांचे प्रबळ दावे हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे.
गंगापूरमध्येही वादविवाद
गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्या समोर शिवसेनेतर्फे कोणाची दावेदारी सफल होते याकडे शिवसेनेच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे आणि गंगापूर- खुलताबादमधील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी शिवसेनेतर्फे दोन वेळा आमदारकी भूषविलेले माजी आमदार अण्णासाहेब माने आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात उमेदवारी मिळविण्यावरून जोरदार संघर्ष दिसत आहे. माने यांनी मतदारसंघाच्या बाहेरचा उमेदवार नको, अशी भूमिका घेतली आहे, तर दानवे यांनी आता उमेदवारी मिळाली नाही तर राजकारणात कायमची पीछेहाट होण्याची शक्यता गृहीत धरून जोर लावला आहे. दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूसही चालू आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेपुढे पेच निर्माण झाला आहे. आता परिस्थिती अशी आहे की, शिवसेनेतर्फे या दोघांपैकी एकाला तिकीट मिळाले तर दुसरा त्याचे काम करणार नाही.
आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. आ. बंब यांनी निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक केली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी सदस्यही बनले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तेथे उमेदवार देणार की आ. बंब यांना पाठिंबा देणार याबाबत संभ्रम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गतवेळी बंडखोरी केलेले कृष्णा पाटील डोणगावकर हे यावेळी इच्छुक आहेत. खुलताबाद पंचायत समितीचे माजी सभापती विलास चव्हाण आणि वाळूज महानगर परिसरातील डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी उमेदवारी मिळण्यासाठी दावा केला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोरही त्रिकोणी पेच आहे.

Web Title: Patches in 'Gangapur' and 'Central' Assembly Constituencies