मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
By मनीषा म्हात्रे | Updated: April 24, 2026 12:19 IST2026-04-24T12:18:32+5:302026-04-24T12:19:29+5:30
टिटवाळा पार्टी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक माहितीत या प्रकरणातील मुख्य आरोपी आमीर सय्यद याने परदेशातून तब्बल २५ हजार एक्स्टसी या पार्टी ड्रग्ज गोळ्यांचा साठा मागवून त्यापैकी सुमारे २० हजार गोळ्या अवघ्या सात ते आठ महिन्यांत विकल्याचे समोर आले आहे.

मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: टिटवाळा पार्टी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक माहितीत या प्रकरणातील मुख्य आरोपी आमीर सय्यद याने परदेशातून तब्बल २५ हजार एक्स्टसी या पार्टी ड्रग्ज गोळ्यांचा साठा मागवून त्यापैकी सुमारे २० हजार गोळ्या अवघ्या सात ते आठ महिन्यांत विकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात त्याची प्रेयसी अश्विनी पॉल हिचीही महत्त्वाची भूमिका असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरासह राज्यांतील किरकोळ विक्रेत्यांना या गोळ्यांची विक्री करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पुढे अनेक कॉलेजियन्सपर्यंत हा साठा पोहोचवल्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, आमीर आणि अश्विनी यांनी गेल्या वर्षी जून-जुलैदरम्यान आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कातून हा साठा भारतात आणला. फेब्रुवारीपर्यंत या गोळ्यांची विक्री मुंबई महानगर प्रदेशासह इतर राज्यांतील किरकोळ विक्रेत्यांना करण्यात आली. या विक्रीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय असून, अमलीपदार्थविरोधी पथकाकडून त्यांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू आहे. खात्यांवर पैसे पाठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे संभाव्य ग्राहकाच्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. ही अमलीपदार्थांची तस्करी एअर कार्गोमार्फत झाल्याचा संशय आहे. अश्विनीच्या जप्त मोबाइलच्या आधारे तपास पथक अन्य लिंक शोधत आहे. त्यामुळे तपास कुठंपर्यंत पोहोचतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्याप्ती वाढणार?
इरफान अन्सारी हा मुंबई, महाराष्ट्रासह गोव्यातील कॉन्सर्ट्स व पर्यटन हंगामात एक्स्टॅसीची विक्री करत होता. त्याने हा साठा आमीरसह इतर विक्रेत्यांकडून घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
जामीन रद्द झाल्याने अश्विनीकडे दिला साठा
२०२३ मध्ये ११ किलो हेरॉईन प्रकरणात अटक होण्यापूर्वी आमीर विविध देशांतून अंमली पदार्थ भारतात आणण्यासाठी ‘कॅरिअर्स’चा वापर करत होता. जामिनावर सुटल्यावर त्याने पुन्हा हा धंदा सुरू केला. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेला गैरहजर राहिल्याने त्याचा जामीन रद्द झाला व उर्वरित ५ हजार गोळ्यांचा साठा त्याने फेब्रुवारीत अश्विनीकडे दिला होता.